सविंदणेत तारा घर्षण होऊन चार एकर ऊस खाक
सविंदणे (वार्ताहर) – व्यक्तीच्या मागे अथवा कुटुंबाच्या मागे शुक्लकाष्ठ लागल्यानंतर नियतीकडून जवळची जमापुंजी हिरावून घेतली जाते. असा प्रत्यय सविंदणे (ता. शिरूर) येथील नरवडे कुटुंबीयांना आला आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी बाबाजी नरवडे यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. केवळ महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळेच आज नरवडे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे महावितरणच्या बेजबाबदारपणाच्या वृत्तीमुळे चार एकर उसावर अवलंबून असणारी रोजीरोटी हिरावून घेतली आहे.
सविंदणे येथील बाबाजी नरवडे हे शेतीवर उदरनिर्वाह करणारे कुटुंब आहे. नरवडे यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला होता. त्यातच शेतीत राबणारा माणूसच आजारपणात अंथरूणाला खिळला. त्यात उपचार घेत असतानाच त्यांची जमापुंजी खर्ची होत होती. घरातील कर्ता माणूस अर्धांगवायूमुळे खिळला. नरवडे यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. या ताराखाली त्यांचा चार एकर गळीतास जाणारा ऊस आहे. त्यांच्या शेतीमधून जाणाऱ्या तारांचे घर्षण होऊन चार एकरांमधील ऊस खाक झाला आहे. या शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. महावितरणमुळे नरवडे कुटुंबीयांचा आर्थिक कणा मोडून पडला आहे. सध्या गळीत हंगाम अजून सुरू झाला नसल्यामुळे जळालेला उस गाळपास जाऊ शकत नाही. त्यांनी उपचारासाठी कर्ज घेतलेले आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न ऊस शेतीशी निगडीत होते. महसूल, कृषी व महावितरण विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी माजी सरपंच वसंत पडवळ यांनी केली आहे.
गावात बऱ्याच ठिकाणी तारांना झोळ पडले आहेत. तारा खाली लोंबकळत आहेत. त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तारा एकमेकांना घासून आग लागण्यामुळे ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक विद्युत रोहित्राचे फ्यूज बॉक्सची दुरवस्था झाली आहे. महावितरण विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी.
– संतोष मिंडे, सरपंच, सविंदणे.