मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. “एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. मातोश्रीच्या परवानगीशिवाय एकही फाईल हालत नाही,” असे नारायण राणे म्हणाले. यावर तुमच्याकडे येणार आहेत का? असे विचारण्यात आले असता, “आले तर घेऊन टाकू” असे उत्तर दिले.
एकनाथ शिंदे या प्रकाराला कंटाळले असून लवकरच निर्णय होईल, असा गौप्यस्फोट यावेळी नारायण राणे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मारकाचे शुद्धीकरण करून घेतले होते. त्याबद्दल त्यांनी पुन्हा शिवसैनिकांवर टीका केली. मी माझ्या वडिलांचे स्मारक स्वत:च्या पैशांनी व दलदलीच्या जागेत न बांधता चांगल्या जागेत बांधले आहे अशा शब्दांत खोचक टीका केली.
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यात्रेच्या मध्येच वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला गेल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त झाले. राणे यांनी जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी विरोध केला; परंतु त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला गेले. ठाकूर यांनी राणे यांचे स्वागत करत त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
रात्री ८ च्या सुमारास राणे यांची जन आशीर्वाद यात्रा विरार येथे पोहोचली. त्या वेळी आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर राणे यांच्या स्वागताला गेले. त्यांनी राणे यांच्या पाया पडून अभिवादन केले आणि भेटीला बोलावले. राणे यांनी ठाकूर यांना भेटायला जाऊ नये असा कार्यकर्त्यांनी आग्रह केला. त्याला न जुमानता राणे ठाकूर यांना भेटायला विवा महाविद्यालयात गेले. यामुळे कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला.
ठाकूर यांनी राणे आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगत त्यांचे कौतुक केले. इतके दिवस मेहनत करून यात्रेचे आयोजन केले आणि एका क्षणात बट्ट्याबोळ केला अशी प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली. ज्यांच्याविरोधात लढायचे आहे त्यांचीच गळाभेट घेणे हे कार्यकर्त्यांना नाउमेद करणारे लक्षण आहे, असे या नेत्याने सांगितले.