मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील आक्षेपार्ह वक्तव्याने संपूर्ण राज्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. राणेंच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत तर काही ठिकाणी दगडफेकही कऱण्यात येत आहे. मात्र या सगळ्यातच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आपल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान संगमेश्वर इथे आयोजित सभेत राणे बोलत होते. यावेळी त्यांनी, राज्यात यांची सत्ता आहे. आमदारकीचे ५६ आमदार आहेत. हिंदुत्वाशी गद्दारी करुन यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. पण इथे १२ झेंडे दिसत आहेत. काय अवस्था झाली आहे यांची. मी जर आत्ता सांगितलं तर त्यांची पळता भुई थोडी होईल. हे काही दिवसांनी सत्तेवर नसतील. घऱी जावा नाहीतर आम्हाला घऱी पाठवावे लागेल.
या सभेदरम्यान काही शिवसैनिक घोषणाही देत होते. त्यांना गप्प करण्यासाठी राणे यांनी हा टोला लगावला. हे आत्ता शेवटची धडपड करत आहेत. काही दिवसांनी हे सत्तेवर नसतील आणि ह्या समोरच्यांच्या हातात पण काही दिवसांनी हा झेंडा नसेल. त्यांचे मनपरिवर्तन होईल. म्हणून पोलिसांना सांगतोय, त्यांना म्हणावं घरी जा. नाहीतर आम्हाला घरी पाठवावे लागेल.
संगमेश्वर इथं भाजपा आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि मोठा गोंधळ सुरु आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जोरदार घोषणा देत आहेत.