मुंबई : नाशिकच्या विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वातावरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकत सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि भाजपच्या पाठिंब्यावर ती जिंकली सुद्धा. मात्र या निवडणुकीने पुन्हा एकदा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. त्याच वादावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसवर सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपाला खोदून काढत नाना पटोले यांनी,”काँग्रेसमध्ये कसलाही वाद नाही, असा निर्वाळा देत, भाजपच पक्षाला बदनाम करत असल्याचा उलट आरोप केला. विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत पटोले यांनी कानावर हात ठेवले. राज्याचे पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी होणाऱ्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला पटोले हजर राहणार नाहीत. पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात आपण असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष सुरू झाला आहे. पटोले यांच्या कार्यपद्धतीवर व घेतलेल्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करीत थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. पक्षातील गटबाजी उघड झाली आहे. त्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली असून नेत्यांमधील हा वाद मिटविण्यासाठी उद्या प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार आहेत. पाटील थोरात व इतर नेत्यांशी चर्चा करणार आहेत. असे त्यांनी सांगितले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आला. परंतु पटोले यांनी त्याबाबत कानावर हात ठेवले. बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे की नाही हे मला माहीत नाही, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिनाभरातच मुंबईचा दुसऱ्यांदा दौरा केला, याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीशिवाय मोदींना मुंबई, महाराष्ट्राची आठवण होत नाही. जानेवारीत मेट्रोचे उद्घाटन व आता वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणे हे केवळ निमित्त आहे, असे नाना पटोले यांनी यावेळी म्हटले आहे.