-वंदना बर्वे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान देणारा नेता, अशी नाना पटोले यांची प्रतिमा आहे आणि याच वैशिष्ट्यांमुळे कॉंग्रेसने त्यांच्या हातात महाराष्ट्राची धुरा दिली आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा बहुचर्चित मुद्दा निकाली निघाला. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्र कॉंग्रेसची धुरा नाना पटोले यांच्या हाती देण्याचा निर्णय मागच्या शुक्रवारी घेतला. आपल्याला पद नको; परंतु संघटनेचे काम करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती. नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली.
खरं सांगायचं म्हणजे, दस्तुरखुद्य नाना पटोले या दिवसाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होते. 2017 च्या डिसेंबर महिन्यात त्यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. यानंतर कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेतला. तेव्हापासून संघटनेचे काम करायचे होते. आता नानांची ही इच्छा पूर्ण झाली. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची वाट तशी सोपी नव्हती. कॉंग्रेस-भाजप-कॉंग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. ते कुठेही टिकत नाहीत असा मुद्दा रेटून पक्षातील काही नेत्यांनी नाना यांच्या निवडीला विरोध दर्शविला होता. शिवाय, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.
तरीसुद्धा, कॉंग्रेसने नाना पटोले यांच्या हाती राज्याची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला. यामागे अनेक कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे, राहुल गांधी यांना पक्षाच्या नवीन नेत्यांकडून काही अपेक्षा आहेत. संघटनेचा पदाधिकारी हा संघटनेच्या निवडणुकीतून निवडून यायला पाहिजे, असं त्यांना वाटतं.
राहुल गांधी यांनी या गोष्टीची अंमलबजावणी दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय युवक कॉंग्रेसपासून केली होती. महाराष्ट्रासह देशभरातील युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निवडून यावेत म्हणून त्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, दुर्दैवाने, कॉंग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांनी हा प्रयोग यशस्वी होऊ दिला नाही. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष हे निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडून आले होते. परंतु, डावपेचाने निवडून आले होते. मोठ्या नेत्यांच्या मुलांसमोर सामान्य कार्यकर्त्यांचे काहीच चालत नाही, हे तेव्हा दिसून आले होते.दुसरे म्हणजे, कॉंग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे आहे, हाच कार्यकर्ता कॉंग्रेसमध्ये सर्वाधिक उपेक्षित आहे. मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा विचार करायला पाहिजे, असं राहुल गांधी यांना वाटतं.
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची धाडसी वृत्ती. 2014 च्या निवडणुकीत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट उसळली होती. भाजप एकामागून एक राज्य आपल्या ताब्यात घेत होते. सर्वत्र भाजपचा झेंडा फडकताना दिसत होता. अशात, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर शेतकऱ्यांची उपेक्षा करण्याचा आरोप करीत खासदारकीचा राजीनामा दिला होता. नानांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. स्वतःहून आपली राजकीय कारकीर्द संपविली, अशी चर्चा त्यावेळेस रंगली होती. कारण, कोणत्याही दिशेला तोंड केले तरी फक्त नरेंद्र मोदी हेच दिसत होते.
भाजपच्या खासदारकीचा राजीनामा नाना पटोले यांच्या राजकीय जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे, असं म्हणायला हरकत नाही. नाना हा राजीनामा टाइप करीत होते तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालिन प्रभारी मोहन प्रकाश आणि राजीव सातव त्यांच्या घरी उपस्थित होते. “आपको क्या चाहिए, राज्यसभा या विधान परिषद?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी प्रवेशापूर्वी विचारला होता. मात्र, “मला काहीही नको. कॉंग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे,’ असं नाना म्हणाले होते. यावेळेस राहुल गांधी यांनी “ओह! नाइस फेलो’, अशा शब्दात कौतुक केलं होतं. 2019 सालच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचे हेवीवेट मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून रिंगणात उतरविले. मात्र नाना पराभूत झाले. यानंतर कॉंग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना तिकीट दिले. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पराभूत करण्यासाठी खास मोहीम राबविली होती. परंतु, नाना विजयी झाले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. यात विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नानांच्या खांद्यावर टाकण्यात आली.
नाना पटोले यांचा अध्यक्षपदाच्या वर्षभराचा कार्यकाळ बघितला तर; त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाला खऱ्याअर्थाने ग्लॅमर आणि महत्त्व मिळवून दिलं, असं म्हणायला काहीही हरकत नाही. अधिवेशनाच्या काळात अध्यक्षाची चर्चा व्हायची. नाना यास अपवाद राहिले. ते वर्षभर प्रकाशझोतात राहिले. राज्याच्या मुख्य सचिवांवरही कारवाई करण्यात त्यांनी मागेपुढे बघितले नव्हते. यासर्व गोष्टी पथ्यावर पडल्यात आणि नाना प्रदेशाध्यक्ष बनलेत. कॉंग्रेसच्या या सर्व समस्यांवर नाना हे औषध ठरतील, अशी कॉंग्रेस हायकमांडला अपेक्षा आहे. हे खरं असलं तरी, नानांची वाट दिसते तेवढी सोपी नाही.
केंद्र सरकारचा निर्भिडपणे सामना करणारे नेतेही आहेत. यात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. अशा वातावरणात, नाना पटोले यांनी केंद्र सरकारविरुद्ध ताल ठोकावी अशी राहुल गांधी यांची इच्छा आहे. ते एक शेतकरी नेते आहे. शेतकरी कॉंग्रेसची धुरा त्यांच्या हातात होती. देशाच्या सीमेवर मागील दोन-तीन महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाला बसला आहे. नाना पटोले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कॉंग्रेसशी कसे जोडतात, हा खरा प्रश्न आहे.
नाना पटोले आक्रमक आहेत. संघटन कौशल्य उत्तम आहे. सीबीआय, ईडी आणि आयकर खात्याची भीती नाही. त्यामुळे एक यशस्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची क्षमता त्यांच्यात आहे.