मुंबई – गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे, असा चिमटा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचा घेतला आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली तसेच काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढेल, असेही ते सातत्याने सांगत आहेत. त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडली आहे. भाजपकडून सुद्धा यावर भाष्य करण्यात आले आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना ‘पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे आणि येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते.
मुख्यमंत्री होण्यासाठी पटोले आणि अजित पवार यांच्याकडे तीन वर्षांचा काळ असून त्यानंतर 2024मध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचंही दानवेंनी म्हणाले आहेत.