मुंबई : राज्यात इतरत्र करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी राज्यातील करोनाचा धोका काही कमी झालेला नाही. कारण अजूनही राज्यातल्या ६ जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या सहा जिल्ह्यांत मात्र अजूनही पॉझिटिव्हिटीचे प्रमाण १० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे अजूनही चिंतेचे वातावरण असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. अनेक जण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर पडत आहेत. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करूनही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने रुग्णसंख्या आटोक्यात कशी आणायची, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सरासरी ११ हजार ३० दैनंदिन रुग्णांची नोंद होते आहे. ७ ते १३ जूनदरम्यान राज्यात ७७ हजार २११ रुग्णांची नोंद झाली, तर त्यापूर्वी ३० मे ते ६ जूनदरम्यान १ लाख ३ हजार ४८९ रुग्ण आढळून आले आहेत. या आठवड्यात सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या १४ हजार ७८४ असल्याचे दिसून आले आहे.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, राज्यात २० हून अधिक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्ववत झाले असून मुंबई, नाशिकसारख्या शहरातील साथ आटोक्यात आली आहे. मात्र केवळ खबरदारीचा उपाय म्हणून तेथील निर्बंध काहीसे कठोर आहेत.