मुंबई – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद अधिवेशनात उमटले आहे. मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. आज काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी राज्यसभेत मोहन डेलकर यांची आत्महत्या आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मोहन डेलकर म्हणाले,’मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत सापडलेले जिलेटीन नागपूरच्या ज्या कंपनीत तयार झाले त्या कंपनीची, डिस्ट्रीब्युटर किंवा पुरवठादार यांची चौकशी का केली जात नाहीये, असा सवाल कुमार केतकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच जिलेटीन बनवणाऱ्या कंपनीच्या व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राम मंदिरासाठी १५ कोटी रुपये दिले आहेत, त्यामुळे याची चौकशी केली जात नाहीये असा आरोपही कुमार केतकर यांनी विचारला आहे.’
दरम्यान, स्कॉर्पिओमधून जप्त केलेल्या जिलेटीन काड्यांवर नागपूर येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे नाव आहे. त्यामुळे जिलेटीन त्या भागातून आणल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी, गाडीसोबत भाजप नेत्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजप नेत्याचे फोटो शेअर केले आहे.