नगर – शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय ते जीपीओ चौक या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकाची व वाहनांची वर्दळ जास्त असल्याने या रस्त्यातील खड्यांचा त्रास नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना होत आहे. रस्ते, पाणी आणि विविध नागरी समस्यांबाबत तक्रारी करण्यासाठी जिल्हय़ातील नागरिक जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतात. समस्यांचे निवारण केले जाते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडेच जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. जुन्या कलेक्टर कार्यलया असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता मध्यभागी खराब झाला असून अर्ध्या रस्त्याचे काम झाले आहे तर अर्धा रास्ता खराब आहे. वाहनधारक आणि नागरिकांना रस्त्यांमुळे नाहक त्रास होत आहे. पावसाळ्यात पाणी साचत असल्याने त्यामधून वाहने गेल्यास खड्डयातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडते. या आवारातील समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.