नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी छत्तीसगड येथील रायपूर येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात मोठे वक्तव्य केले आहे. सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या अधिवेशात सोनिया गांधी यांनी राजकरणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.
रायपूर येथील अधिवेशनात पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, “2004 आणि 2009 मधील आपला विजय तसेच डॉ. मनमोहन सिंह यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. मात्र सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेसोबत माझा राजकीय प्रवास देखील थांबू शकतो. काँग्रेससाठी ही यात्रा महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. भारतातील जनतेला शांती, सहिष्णुता आणि समानता हवी आहे, हे सिद्ध झालं आहे.”
देशात 2004 ते 2014 या काळातील काँग्रेसच्या सत्तेचा संदर्भ देत सोनिया गांधी यांनी, डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने खूप चांगले सरकार दिले. काँग्रेसने देशात लोकशाही मजबूत केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रवास यशस्वी झाल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. खंबीर कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून ती लोकशाही असल्याचे सोनिया गांधी यांनी यावेळी म्हटले.
केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, “काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप आणि आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून उद्ध्वस्त केली आहे. यांनी काही व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजप द्वेष पसरवत आहे आणि अल्पसंख्याक, महिला, दलित आणि आदिवासींना लक्ष्य करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपच्या सत्तेला आपण खंबीरपणे सामोरे जावे. लोकांपर्यंत जाऊन आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.