मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले.
तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. मात्र, यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे.
त्यामुळे आता या दोन्ही गटातील नेते आक्रमक झाले असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडात आहेत. अश्यातच, ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं रावणाच्या हाती नाही’. असा हल्लाबोल सुभाष देसाई यांनी केला आहे.
ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धनुष्य घेऊन येत असले तरी आम्ही पण आता मशाल घेऊन येऊ. त्या मशालीनेच सगळा बदल करू आणि त्यामध्ये दाढीही जाळून टाकू, ज्या प्रमाणे धनुष्यबाण रामाच्या हाती शोभून दिसतं रावणाच्या हाती ते शोभून दिसत नाही.
त्यामुळे शिवसेनेचे धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळाले असले तरी ते तुम्हाला शोभून दिसत नाही’ अशी टीका देसाई यांनी केली आहे. दरम्यान, सुभाष देसाई यांच्या या वादग्रस्त वक्त्यावरून येणाऱ्या काळात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.