नगर -राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील सर्वसामान्य लोक माझ्याकडे आपले प्रश्न घेऊन येतात ते सोडविल्यामुळे त्यांचा मनात मी माजी आमदार म्हणून नव्हे तर आमदार म्हणूनच मला ओळख देतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा समजतो, असे प्रतिपादन माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीच्यावतीने कचरा गोळा करण्यासाठी नवीन घंटागाडीचे लोकार्पण कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बुऱ्हाणनगरचे उपसरपंच बाळासाहेब कर्डिले, राजाराम कर्डिले, श्रीधर पानसरे, रावसाहेब कर्डिले, तात्या कर्डिले, किशोर कर्डिले, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुद्धे, बाळासाहेब पवार, शिवाजी पालवे, डॉ.दरंदले, रामदास काकडे आदी उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले, बुऱ्हाणनगरचा सरपंच असल्यापासून लोकांचे प्रश्न सोडविल्याने सर्वसामान्य जनतेने गेली 25 वर्षे कामाची पावती म्हणून मला आमदारकी बहाल केली होती. आता जरी विधानसभेचा आमदार नसलो तरी सर्वसामान्य जनतेचा मनात मी आमदार राहिल्याने विकासकामे करणे हे कर्तव्य समजून हे विकास पर्व सुरु आहे.
बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत हद्दीतील वाढती उपनगरे लक्षात घेऊनच या परिसरातील पाणी, रस्ते, वीजेचा प्रश्न सोडविले. आता स्वच्छ भारत. समृद्धा भारत करण्यासाठी कचरा संकलनासाठी घंटागाडी सुरु झाली आहे. लोकांनी त्याचा उपयोग करावा. घर जसे स्वच्छ ठेवता तसा परिसर स्वच्छ ठेवा. लवकरच ज्या भागात ड्रेनेजचा प्रश्न राहिला आहे, तो सोडविण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी अमोल धाडगे, सचिन फाळके, सोमनाथ नजन आदींसह नागरिक उपस्थित होते.