पुणे -महापालिकेच्या अंदाजपत्रकाला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून गळती लागली आहे, ती थांबवली पाहिजे. प्रभागात काम करण्यासाठी टक्केवारी देऊन नगरसेवकांना काम करावे लागत आहे. विरोधी नगरसेवकाला तर बजेटच दिले जात नाही, त्याच्या अस्तित्वाचा प्रश्नच सत्ताधारी पक्षाने निर्माण केला आहे. या सगळ्या कारभाराला पुणेकर नागरिक कंटाळले आहेत, त्यामुळे महापालिकेत महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास वाटत असल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.
मंडई विद्यापीठ कट्टातर्फे कसबा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचीत महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी केले होते. यावेळी आमदार धंगेकर बोलत होते. या प्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, माजी आमदार महादेव बाबर, रवी पाटोळे, सुनील शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोहन जोशी, माजी आमदार महादेव बाबर यांनीही मार्गदर्शन केले.