सविंदणे (प्रतिनिधी) :- उरळगाव(ता.शिरूर)येथील भीमा नदी पात्रात सापडलेल्या इसमाचा मृतदेह शीर नसलेल्या व धडाचे तुकडे असलेल्या स्थितीत आढळून आला होता. सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मा मॅडम यांनी गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या होत्या.
त्यानुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहा.फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर,दत्तात्रय तांबे,पोलीस नाईक जनार्दन शेळके,गुरु जाधव,राजु मोमीन,पोलीस कॉन्स्टेबल समाधान नाईकनवरे, अक्षय जावळे,शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जगदाळे,पोलिस नाईक संजय जाधव यांचे पथक तयार करून तपासासाठी रवाना केले होते.
दरम्यान सदर पथकाने सर्वप्रथम गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता मयत इसमाचे नाव बापु तावजी शिंदे, (रा. मलठन,ता. शिरूर, जि.पुणे ) असे असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या माहितीनुसार व गोपनिय बातमीच्या आधारे जालिंदर सुखदेव थोरात(रा. वाघाळे,ता. शिरूर, जि. पुणे ) व हिरामण तुकाराम चोरमले(रा. उरळगाव, ता.शिरूर,जि.पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जालिंदर सुखदेव थोरात याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आपला दाजी बापू शिंदे यांचा दृश्यम चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पुरावा मागे न ठेवता खून करण्याचा कट तयार केला व तयार केलेल्या कटाप्रमाणे बापू शिंदे यांस मलठण येथून उरळगाव येथे मासे आणण्यासाठी जाण्याचा बहाणा करून उरळगाव येथे घेऊन गेले.तेथे ठरल्याप्रमाणे दुसरा आरोपी हिरामण चोरमले हा कुऱ्हाड घेऊन आला व त्या दोघांनी संगनमत करून बापू शिंदे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे हात, पाय,पोट कुऱ्हाडीने तोडून मयताचे प्रेत भीमा नदीच्या पात्रात टाकून दिले.असे सांगितले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अशाप्रकारे कोणताही सुगावा मागे नसताना निर्घृण खुनाचा गुन्हा पथकाने उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पथकास बक्षीस जाहीर केले आहे.पथकाने मृतदेह मिळाल्यानंतर चोवीस तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला आहे.त्यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करत आहेत.