पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला
पिंपरी – आर्थिक वादातून एका निवृत्त पोलिसाच्या मुलाचे रहाटणीतून अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह कासारसाई येथे पुरला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 2) रोजी उघडकीस आली.
संतोष शेषराव अंगरख (वय 42, रा. संतोष निवास, पोलीस कॉलनी, श्रीनगर, रहाटणी) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयत संतोष यांचे वडील आणि निवृत्त पोलीस शेषराव रंगनाथ अंगरख (वय 63) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश सुभेदार पवार (वय 37, रा. स्वामी समर्थ कॉलनी, तापकीर नगर, काळेवाडी) याच्यासह त्याच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संतोष मेडिकल साहित्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करीत होते. त्यांनी व्यवसायासाठी आरोपी गणेश याच्याकडून पैसे घेतले होते. पैसे मागण्यासाठी गणेश दोन वेळा फिर्यादी यांच्या घरी आला होता.त्यावरून त्यांच्यात वादही झाला होता. 16 ऑगस्ट रोजी सकाळी संतोष व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या दुचाकीवरून घराबाहेर पडले. सायंकाळी साडेसात वाजता संतोष यांच्या मोबइलवरून त्यांच्या मुलीला फोन आला होता. आपण गणेश पवार याच्या गाडीत त्याच्या दोन मित्रांसह आडले, कासारसाई येथे असून रात्री उशिरा घरी येऊ, असे फोनवरून सांगण्यात आले होते. संतोष त्या रात्री घरी आले नाहीत. फिर्यादी यांनी संतोष यांच्या मोबइलवर फोन केला. त्याला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून गणेशकडे चौकशी केली.
त्यावेळी गणेशने उलटसुलट उत्तरे दिली. त्यावरून गणेश याच्यावर संशय बळावला. त्यानंतर त्यांनी 25 ऑगस्ट रोजी वाकड पोलीस ठाण्यात संतोष यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिली. पोलिसांनी गणेश याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
असा केला खून
आरोपी गणेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून संतोष यांचे रहाटणी येथून त्यांच्या गाडीतून अपहरण केले. संतोष यांना कासारसाई जवळ आडले येथे नेले. तिथे संतोष यांच्या डोक्यात दगड आणि जेसीबीची बकेट मारून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संतोष यांचा मृतदेह तिथेच पुरून टाकला.