महाबळेश्वर – महाबळेश्वर शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय असून तिन्ही प्रवेश नाक्यांवर पालिकेचे कर्मचारी तैनात आहेत. तरीही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनधिकृत वस्तूंची वाहतूक होत असल्यामुळे या नाक्यांवर पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. तसेच मास्कशिवाय कोणतेही साधन नसलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात आरोग्य साधनेही मिळणे गरजेचे आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असल्या तरी प्रत्येक नाक्यावरून दररोज सुमारे दोनशे वाहने महाबळेश्वरात दाखल होत आहेत. महाबळेश्वरात दाखल होण्यासाठी 3 मार्गांवर 3 नाकी आहेत. वाई- पाचगणी मार्गे वेण्णा लेक नाका, मेढा- केळघर मार्गे सातारा नाका, महाड- पोलादपूर मार्गे महाड नाका हे सर्व नाके महाबळेश्वर नगरपालिकेच्या अंतर्गत असून येथे पालिकेचे कर्मचारी तैनात आहेत.
या प्रत्येक नाक्यावरून महाबळेश्वरात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्या खूप जास्त असून येणाऱ्या वाहनांची नोंद पालिका कर्मचारी करत आहेत. परंतु, परजिल्ह्यातून आलेल्या जीवनावश्यक सुविधा पुरवणारी वाहने व आलेल्या लोकांची कुठल्याही प्रकारची तपासणी न करता त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे.जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून जिल्हांतर्गत वाहतूकही करोनाचा प्रसार करू शकते, ही बाब अत्यंत धोकादायक असून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. इतर जिल्ह्यातून, शहरांतून महाबळेश्वरात दाखल होणाऱया वाहनांना निर्जंतुकीकरण करून व वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी करूनच शहरात प्रवेश द्यावा.
महाबळेश्वर शहराच्या प्रवेश नाक्यावर तैनात असलेले पालिका कर्मचाऱ्यांकडे साधे हॅण्ड ग्लोजसुद्धा नाहीत. फक्त मास्क घालून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे. याबाबत पालिकेने योग्य खबरदारी घेऊन कर्मचाऱ्यांना आरोग्य साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. महाबळेश्वरच्या आजूबाजूच्या गावातील लोकांच्या गाड्या पालिका कर्मचाऱ्यांनी अडवल्यास कर्मचाऱ्यांबरोबर हमरीतुमरी, दमबाजी होत आहे.
शहराच्या प्रवेश नाक्यांवर पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे अवैध वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली वाहनांतून अनधिकृतपणे इतर बाबींची वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प असले तरी महाबळेश्वरात वाळू वाहतूक व बांधकाम साहित्य वाहतूक सुरळीतपणे सुरूच आहे. दारू व गुटख्यांची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. महाबळेश्वरात पोलिसांचे संख्या बळ कमी असून अवैध धंद्यांवर चाप बसवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.