पिंपरी -बिकट परिस्थितीत कोविड योद्ध्यांनी जीवनाची “रिस्क’ घेतली होती. घरादारावर तुळशीपत्र ठेऊन हे लढवय्ये योद्धे काम करीत होते. कोविडच्या भीतीने कोणीच घरी बसले नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचे महत्त्व नाकारता येणार नाही. त्यांचा होणारा सन्मान हा त्यासाठीच महत्त्वाचा आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (दि. 30) व्यक्त केले.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथदान सोहळा व कोविड योद्ध्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम पिंपरी-संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केला होता. त्या प्रसंगी टोपे बोलत होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जनसेवा प्रतिष्ठाण (पुणे) आणि ह.भ.प. अशोक काळे व सहकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी नगरसेवक संतोष बारणे, महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आदी उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. गोफणे, डॉ. वाबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हुसेन, महादेव बोत्रे, स्मिता जोशी, विद्या भुरके व अन्य अशा एकूण 81 कोविड योद्ध्यांना तुकोबांची गाथा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. लेखक दत्तात्रय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
टोपे म्हणाले, पिंपरी-चिंचवड देशात अव्वल “ग्रोथ रेट’ असलेला भाग राहिला आहे. या शहराला मिळणारे उत्पन्न व विकासाचा वेग मोठा आहे.
पिंपरी – आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये करोनाचा ओमिक्रोन हा नवा विषाणू सापडल्याने राज्य सरकारने ऍलर्ट दिल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कार्तिकी एकादशीच्या सुट्टीच्या दिवशीदेखील (दि.30) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. यामध्ये गेल्या पंधरा दिवसांत परदेश प्रवास करून आलेल्या शहरातील नागरिकांची माहिती संकलित करण्याच्या सूचना केल्या आहेत.
परदेश प्रवास केलेल्या सर्व नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे. यामध्ये पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवून उपचार केले जाणार आहेत. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना गृहविलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यामुळे आता महापालिका कर्मचारी अशा प्रवाशांचा शोध घेत आहेत.
ओमिक्रोनचा नवा विषाणू सापडल्याने देशात हाय ऍलर्ट देण्यात आला आहे. तर केंद्र सरकारच्या आदेशाची वाट न पाहता उपाययोजना करायला सुरुवात करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सुट्टीच्यादिवशी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. त्यामध्ये आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत परदेशातून शहरात आलेल्या नगारिकांची माहिती महापालिकेच्या कोविड हेल्पलाइनवर 8888006666 कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा सुरू करण्यास 15 डिसेंबरपर्यंत स्थगिती
शहरातील संसर्ग दर कमी झाल्याने शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग उद्यापासून (दि. 1) सुरु करण्यात येणार होते. तशा सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. मात्र, हाय अलर्टमुळे शाळा सुरू करण्यास 15 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नव्याने सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्याचा संदर्भ देत, प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गत शाळा सुरू करण्यास 15 दिवसांची स्थगिती दिल्याचे नमूद केले आहे.
परदेशी प्रवास केलेल्या नागरिकांना आवाहन
गेल्या पंधरा दिवसांत परदेश प्रवास करुन शहरात अनेक नागरिक दाखल झाल्याची दाट शक्यता आहे. अनेक नागरिकांकडून या परदेश प्रवासाची माहिती दडविली जाते. त्यामुळे करोनासारखा संसर्गजन्य आजाराचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत परदेश प्रवास केलेल्या नागरिेकांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करुन, स्वत: हून आपली माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
===============