मुंबई – करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मात्र या परिस्थितीतही मुंबईकर एकमेकांच्या मदतीला धावून माणुसकी अद्यापही जिवंत असल्याचे दाखवून देत आहेत. अशीच मुंबईतील एक घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील पाणीपुरी विक्रेते भगवती यादव यांचा करोनामुळे मृत्यू झाला. यानंतर येथील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबाच्यामदतीसाठी धाव घेतली आहे.
मुंबईतील नेपियन्सी रोडवर भगवती यादव हे सुमारे 46 वर्षांपासून पाणीुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. भगवती यादव हे बिस्लेरी पाणीपुरीवाला म्हणून प्रसिद्ध होते. पाणीपुरी तसेच इतर पदार्थांसाठी ते बिस्लेरीचा वापर करत असल्याने त्यांना हे नाव पडले होते. या भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने भगवती यादव यांनाही करोनाचा संसर्ग झाला. यातच त्यांचा मृत्यू ओढावला. परिसरात प्रसिद्ध असलेल्यभगवती यादव यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी कुटुंबाला आर्थिक मदतीसाठी मोहीम हाती घेतली.
या मोहीमेत रहिवाशांनी 42 दिवसांत पाच लाखांची आर्थिक मदत उभा करण्याचा निर्धार केला असून दोन दिवसांतच त्यांच्याकडे दोन लाख रुपये जमा झाले आहेत.