शिरूर -तालुक्यातील न्हावरे भागात पेरणी केलेल्या बाजरीची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तालुकास्तरीय तक्रार समितीचे अध्यक्ष समित सदस्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक यांनी न्हावरे भागात तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शास्त्रज्ञांच्या मदतीने पाहणी केली.
शिरूर तालुक्यात यंदाच्या वेळेस चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लवकरच खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या. टाकळी हाजी, मलठण, न्हावरे, खैरेवाडी यांसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पायोनियर कंपनीच्या बाजरीच्या बियाण्याची पेरणी केली; परंतु पेरणीनंतर पंधरा दिवस झाले तरी, या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पीक उगवण झाली नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डीलर दुकानदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. एक एकरावर बाजरी ते पिकाची पेरणी करायची असेल तर जवळपास साडेचार ते साडेपाच हजार रुपये खर्च येत असतो. त्याबरोबर त्याचे कष्ट ही असते.
जवळपास शिरूर तालुक्यात हजारो हेक्टरवर बाजरीची पेरणी केली आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या शेतकऱ्याला आता लवकरात लवकर नुकसान भरपाई कंपनीकडून मिळावी, अशा तक्रारी पंचायत समिती कृषी विभागाकडे शेतकरी वर्गाने केल्या होत्या. त्याची दखल घेऊन शिरूर तालुकास्तरीय तक्रार समितीने याची दखल घेऊन शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बाजरीचे बियाणे उगवले नाही. त्याची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, कृषी शास्त्रज्ञ बी. बी. पाटील, यांनी तालुकास्तरीय तक्रार समितीचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी सतीश केळगद्रे, पंचायत समिती कृषी अधिकारी नीलेश बुधवंत, मंडल कृषी अधिकारी के. एल. सात्रस, पायोनियर कंपनीचे गोडसे, कृषी सहाय्यक एस. डी. वाकचौरे, एस. एम. नाईक, न्हावरे येथील शेतकरी आनंदा तांबे, संभाजी लांडगे, विनायक भगत, उपस्थित पाहणी करण्यात आली.
अनेक शेतकऱ्यांच्या बाजरी बियाणे पेरून उगवले नसल्याच्या तक्रारी आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह न्हावरे, कोकडेवाडी, शिंदेवाडी मलटण खैरेवाडी या भागात पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शिरूर तालुका समितीच्या सर्व सदस्यांनी रॅण्डमच्या साह्याने तीन बाय तीन चौकोन आखून त्यात उगवण्याचे परीक्षण केले. याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल.
-सतीश केळगद्रे, तालुका कृषी अधिकारी