शिरूर – तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बाजरीचे पेरणी केलेले पायोनियर बियाण्याची उगवण झाली नाही. या कंपनीवर कारवाई करण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पालकमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडेही तक्रार करण्यात येईल.
शिरूर तालुक्यातील शिरूर, मलठण, न्हावरे, खैरेवाडी, टाकळी हाजी यांसह अनेक भागांत पायोनियर कंपनीचे बाजरीचे पेरलेले बी याची उगवण झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत त्याबरोबर शेतकऱ्याला आर्थिक मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. यामुळे शेतकऱ्याची मेहनत वाया गेली आहे. नुसतेच बियाणाचे नुकसान झाले नाही, तर त्यात अनेक दिवस वाया जाणार आहेत. त्यामुळे या कंपनीने शेतकऱ्यांना या सर्वांची बेरीज करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे.
कंपनी व्यवस्थापन किंवा अधिकारी धूप व जास्त पावसाची कारणे सांगत असतील तर ते एका गावासाठी मान्य केले असते; परंतु अनेक गावांत तुमच्या कंपन्यांचे बियाण्यांची उगवण झाली नाही. त्यामुळे बियाणे निकृष्ट असल्याचे सिद्ध होते.
शिरूर तालुक्यातील विविध भागातून आजपर्यंत 23 शेतकऱ्यांनी पायोनियर बाजरीची पेरणी करून त्याची उगवण झाली नसल्याचे तक्रार केली आहे.
-निलेश बुधवंत, कृषी अधिकारी पंचायत समिती