नवी दिल्ली: मुंबईतील डबेवाले सध्या करोनामुळे असलेल्या लॉकाडाऊनमुळे मोठ्या अडचणीत आहेत. डबेवाल्यांनी ते लॉकडाऊनचा स्वीकार करत असल्याचं सांगितलंय. मात्र, डबेवाल्यांचा व्यवसाय व्यवसायिक, नोकरदार, इतर ग्राहकांवर अवलंबून असतो. डब्बा देणंच बंद असेल, जर ग्राहकच नसेल तर आपलं पोट कसं भरायचं अशी गंभीर समस्या त्यांच्यासमोर उभी आहे. त्यामुळे त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.
डबेवाल्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 130 वर्षांमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या काळापर्यंत लॉकडाऊनमुळे त्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे. मदतीचं आवाहन करत डबेवाल्यांनी तुमची एक छोटीशी मदत, एका डबेवाल्याचं कुटुंब वाचूव शकत असल्याचं सांगितलंय.
जवळपास 5 हजार डब्बेवाले 2 लाख लोकांना डबा पोहचवण्याचं काम करतात. मुंबई डब्बावाला असोसिएशन एक ‘रोटी बॅंक’ही चालवतात. या ‘रोटी बॅंक’द्वारे रुग्णालयात इलाज करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना मोफत जेवण दिलं जातं.
मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतोच आहे. देशात 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1895वर पोहचला आहे. त्यामुळे मुंबई आता रेड झोनमध्ये आली असून रुग्णांची वाढती संख्या मुंबईसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.