मानुसकी करोनाच्या अडचणीतूनही मार्ग काढेल
नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे जागतिक पातळीवर भौतिक आणि मानसिक उलथापालथ झाली आहे. यामुळे मानवी समूहाला आत्मपरीक्षण करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा वापर करून आपण अधिक समाधानी आणि संतुलित राहण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्याची गरज आहे, असे अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे.
कर विभागाच्या न्यायालयीन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. घर, कुटुंब आणि समाजातील आपली कर्तव्य पूर्ण करताना संतुलित कसे राहणे या विषयावर बोलताना रविशंकर म्हणाले की, करोनामुळे वस्तूच्या गरजाऐवजी माणसामाणसातील परस्पर नात्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्याच्या परिस्थितीत भौतिक आणि मानसिक संतुलनासाठी योग्य आहार, योग्य झोप आणि ध्यानधारणेचेची गरज निर्माण झाली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लोकांनी खचून जाण्याची गरज नाही. त्या ऐवजी आत्मचिंतन करून त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे. या अगोदर जगामध्ये अनेक साथीचे रोग पसरले होते. मात्र यातून माणसाने मार्ग काढला आहे. करोनातूनही माणूस मार्ग काढेल.
परस्परांना मदत करण्याची गरज आहे ही भावना अशा अडचणीच्या प्रसंगातून अधिक प्रभावी होते. ते आता होत आहे. त्यामुळे अनेकांना मानसिक धक्का वगैरे बसला असण्याची शक्यता आहे. मात्र अशा लोकांना इतर लोकांनी मदत करण्याची गरज आहे. यासाठी अध्यात्माचा काही प्रमाणात उपयोग केला जाऊ शकतो. अगोदर लोक वस्तूंच्या मागे लागल्याचे चित्र होते. मात्र करोनामुळे परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. लोक नातेसंबंधाला महत्त्व देऊ लागले आहेत. आपण कोण आहोत आपल्या सामूहिक आनंदासाठी आपल्याला काय करायला पाहिजे याबाबत नव्याने विचार सुरू झाला असल्याचे ते म्हणाले.