श्रीरामपूर – महावितरणकडून सुरु असलेली सक्तीची वसुली, पैशांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून वीज जोडणी देण्यास होणारी दिरंगाई, भारनियमन, रोहित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक अशा विविध समस्यां संदर्भात राष्ट्रीय जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारून मागण्यांचे निवेदन महावितरणच्या श्रीरामपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांना दिले.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडकर यांनी निवेदन स्वीकारले. वीज ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ‘राजद’च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख, कार्याध्यक्ष हरीश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख राजेश बोरुडे, सुनील इंगळे, राहुल क्षीरसागर, उपाध्यक्ष योगेश गायकवाड, तालुकाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष विजय कावरे आदी उपस्थित होते.
कोविड काळातील वीज बिल माफ करावे किंवा त्यात सवलत द्यावी. सक्तीची वसुली बंद करून शेतकरी व नागरिकांचे वीज जोडणी खंडित करू नये. ग्रामीण भागात थ्री फेज कनेक्शनचे भारनियमन बंद करावे व शेतकऱ्यांकडून रोहित्र बदलण्यासाठी पैसे घेऊ नये. ऑनलाईन, ऑफलाईन कोणतीही तक्रार असो त्यांचे 24 तासात निवारण करावे, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.