पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून गाडीखाना येथील मालती काची रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा उभारली आहे. मात्र, मनपा विद्युत आणि भवन विभाग यांच्यात समन्वय नसल्याने तब्बल सहा महिन्यांपासून ही यंत्रणा बंद अवस्थेत आहे. धक्कादायक म्हणजे, ही यंत्रणा धुळीत असून ती वापरली न गेल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी वेगळा खर्च करावा लागणार आहे.
अतिशय दाटीवाटीच्या जागेत हे रुग्णालय असून, मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे तसेच शहराला औषध पुरविणारे मध्यवर्ती भांडार येथे आहे. तसेच महापालिकेचे दहा वेगवेगळे विभाग असून, दिवसभर या इमारतीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. त्यातच उन्हाचा चटका वाढल्याने आगीच्या घटनाही वाढत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मनपा आरोग्य विभागाच्या ताब्यात ही इमारत आहे. तिची देखभाल-दुरुस्ती भवन विभागाकडून केली जाते. त्यामुळे भवन विभागाने गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने येथे अग्निशमन यंत्रणा उभारली आहे. ती सुरू करण्यासाठी वीज जोडणीची गरज आहे. त्यासाठी विद्युत विभागाने पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी भवन विभागाने केली आहे. मात्र, भवन विभागाचे काम अर्धवट असल्याचे सांगत ही जोडणीच देण्यात आलेली नाही.
हे दोन्ही विभाग गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांचे काम अपूर्ण असल्यचे सांगत आहेत. परिणामी, येथे काही दुर्घटना घडल्यास महापालिका कोणाकडे बोट दाखविणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश केसेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
या इमारतीत असलेले विभाग
पॅथालाॅजी लॅब, क्ष किरण विभाग, मध्यवर्ती औषध भांडार, बाह्य रुग्ण विभाग, प्रसूतीगृह, कीटक प्रतिबंधक विभाग, क्षयरोग नियंत्रण विभाग, एड्स नियंत्रण विभाग, सेवक आरोग्य तपासणी विभाग, टी.बी तपासणी. प्रयोगशाळा