पुणे – जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे वीजजोड (वीज मीटर कनेक्शन) जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर करण्यासाठी ग्राहकांना धावपळ करावी लागू नये, म्हणून दस्तनोंदणी करतानाच विजेचे कनेक्शन आणि वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी महावितरण आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले.
एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल, तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्स्फर करायचे याची निवड करण्यास सांगितले जाते. नव्या प्रक्रियेत वीज कनेक्शन नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करणे, कागदपत्रे दाखल करणे, पडताळणी करणे व पाठपुरावा करणे हे सर्व कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळणे अपेक्षित होते.
दस्त नोंदणीवेळी वीज कनेक्शन नावात बदलासाठीचा पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय दस्त नोंदणी करताना ग्राहकांना सांगणे अपेक्षित आहे. तरच दस्त नोंदणी झाल्यानंतर वीज कनेक्शन वरील जुन्या मालकाचे नाव जाऊन नवीन मालकाच्या नावावर होण्याची प्रक्रिया केली जाते. परंतु ही माहिती नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे तिचा वापर होत नाही, अशी माहिती भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी दिली.
अशी कार्य करेल यंत्रणा
मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची संगणक प्रणाली जोडली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाली की, महावितरणला संदेश जातो. त्यानुसार संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो व आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्यास कळविले जाते. हे शुल्क ग्राहक घरात बसून ऑनलाइनही भरू शकतो. फी भरली की विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नव्या मालकाच्या नावाने पाठविले जाते.
“जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि महावितरणकडून ही सुविधा राज्यभर उपलब्ध करून दिली आहे. दस्तनोंदणी करण्यापूर्वी पब्लिक डेटा एन्ट्री करताना हा पर्याय येतो. त्यावेळी नागरीकांनी हा पर्याय निवडायचा असतो. तो निवडल्यानंतर ग्राहक क्रमांक योग्यरित्या टाकल्यानंतर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होते. तसेच यातून थकबाकी असेल तर कळू शकते. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.” – संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी