नगर – बुधवारी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका बसला. जिल्ह्यातील नगर शहर, ग्रामीण, कर्जत, संगमनेर आणि श्रीरामपूर विभागातील लघु व उच्च दाबाचे 1 हजार 113 वीजेचे खांब कोसळले. त्यामुळे 100 उपकेंद्रे आणि 463 वाहिन्यांना आणि 8 हजार 144 रोहित्रे बंद पडली. त्यामुळे 650 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
यामुळे महावितरणचे जवळपास 1 कोटी 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अविश्रांत कार्य करीत महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू केले आणि बंद पडलेली व कोलमडलेली यंत्रणा दुरुस्त करून तत्परतेने जिल्ह्यातील बहुतांश भाग लवकरच पूर्ववत केला.
निसर्ग चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी बुधवारी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता वादळ व पावसाने महावितरणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले तसेच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद झाला. तसेच सुरक्षिततेच्या कारणासाठी अनेक ठिकाणी वीजपुरवठा वादळाच्या काळात बंद ठेवण्यात आला होता.
वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार यांनी प्रयत्न सुरु केले. मात्र प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे दुरुस्ती कार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र वारा व पावसाचा वेग ओसरताच गुरुवारी जिल्ह्यातील बहुतांश व आज संपूर्ण भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळविले. महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंते मनीष सूर्यवंशी, शरद बंड, नितीन धर्माधिकारी, डी. बी. गोसावी, सुरेश कुऱ्हाडे आणि अभियंते, जनमित्र, कंत्राटदाराचे कर्मचाऱ्यांनी सातत्याने अहोरात्र कार्य करीत वीजपुरवठा पूर्ववत केला आहे.