नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी एकदा-दोनदा नव्हे तर किमान एक डझनवेळा असे सांगितले आहे की त्यांचा पक्ष स्वबळावर लढणार आहे.
एकीकडे बलशाली भारतीय जनता पार्टी तर दुसरीकडे त्यांना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाची झालेली युती या पाश्र्वभूमीवर मायावती यांचा स्वबळाचा नारा त्यांच्याच पक्षाच्या खासदारांना भयचकित करणारा असून आपला या साठमारीत निभाव लागेल का या चिंतेने त्यांना ग्रासले असून अनेक जण शक्यतांची चाचपणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मागची निवडणूक सपा आणि बसपाने एकत्र लढवली होती. त्यात मायावतींचे १० खासदार निवडून आले होते. तर त्या अगोदरच्या म्हणजे २०१४ च्या निवडणुकीत त्यांना खातेही उघडता आले नव्हते. २०१९ च्या निवडणुकीनंतर मायावती यांनी तातडीने सपासोबतची आघाडी संपुष्टात आणली होती व त्यामुळे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाची दुर्दशा झाली.
आताही त्या स्वबळाचा राग आळवत असल्यामुळे खासदार अस्वस्थ झाले असून दोघांनी तर यापूर्वीच पक्षाला रामराम ठोकला आहे. यातील एक दानीश अलि राहुल गांधी यांचे भक्त झाले आहेत तर अफजल अन्सारी यांनी अखिलेश यांच्या सायकलवर बसणे पसंत केले आहे.
उर्वरित आठ खासदारांपैकी किमान सहा जण भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातील काहींनी दिल्लीत नरेंद्र मोदी यांची भेटही घेतली आहे. हे सगळे होत असताना मायावती यांची नेमकी स्ट्रॅटेजी काय याबाबत राजकीय जाणकारही गोंधळलेल्या स्थितीत आहेत.