मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने चांगलेच डोके वर काढले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील काही गावांवर दावा सांगितल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली होती. अशात शिंदे गटाच्या आमदाराने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
शिंदे गटाचे आमदार राहुल शेवाळे यांनी राष्ट्र्वापतींची भेट घेऊन सीमा वाद सोडवण्यासाठी त्यांना एक पत्र देखील दिले आहे. त्यामुळे आता या सीमावादाबाबत राष्ट्रपती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीसह भाजपच्या इतर नेत्यांनी देखील सीमावाद प्रकारनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा देखील केली होती.
“महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाची दखल घेण्याची विनंती केली. याबाबत केंद्र सरकारला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर योग्य तो तोडगा काढावा, अशी लेखी विनंती राष्ट्रपती यांच्याकडे केली” अशी माहिती राहुल शेवाळे यांनी आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अनेक वर्षांपासून सुरु आहे. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावावर दावा केल्याने पुन्हा एकदा वाद सुरु झाला होता. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील सीमावादाप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रपतींना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी पत्र लिहिल्याने राष्ट्रपती काय निर्णय घेणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.