पुणे – राज्यात महापुरुषांच्या विचारांवर चालणारे महायुतीचे सरकार नव्याने स्थापन करण्यात आले. जुने महाविकास आघाडीचे सरकार घरी पाठविल्यामुळेच राज्यात महापुरुषांची स्मारके उभारता येऊ लागली. स्वातंत्र लढ्यमध्ये महत्वाचे योगदान देणारे आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पुणे महापालिकेच्या वतीने संगमवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या भूमिपुजनप्रसंगी शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकात पाटील, आयुक्त विक्रम कुमार, आमदार सुनील कांबळे, सुनील टिंगरे, चेतन तुपे, भिमराव तापकीर, सिध्दार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, क्रांतीगुरु लहुजी साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरच लहुजी वस्ताद साळवे यांचा आदर्श घेऊन सरकार काम करत आहे. साळवे यांच्या घराण्याने इंग्रजांविरुध्द लढा देत आपला पराक्रमाचा वारसा सतत जपला. नव्या पिढीला त्यांचे बलिदान, कार्य समजावे यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याबाबत शासन प्रयत्न करणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व स्पर्धात्मक युगात त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. देशाच्या इतिहात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा लहुजी वस्ताद साळवे यांनी सुरु केली. त्यातुन त्यांनी हजारोंच्या संख्येने लढणारे तरुण निर्माण करण्याचे महत्वपुर्ण कार्य केले आहे.
बहुसंख्य आद्यक्रांतीकारकांनाही त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. साळवे यांचे स्मारक उभारण्यासाठी आम्हा त्रिमुर्तीची आवश्यकता होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारकाचे काम पुर्ण झाल्यानंतर त्याचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. आगामी काळात शिवाजीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
पुणे हे देशाच्या विचाराचे केंद्र आहे. त्यामुळे पुण्यात काही चुकीच्या गोष्टी थांबवाव्या लागणार असून त्यासाठी कठोर पावले उचलावीच लागणार आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. सर्वच क्षेत्रात भारत देशाला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली ४०० खासदार पेक्षा जास्त खासदार निवडुन आणायचे आहेत. यातुनच देशपातळीवर विकासात्मक बदल होईल, असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.