मुंबई :- मुंबईकरांना सर्वात जास्त त्रास होणाऱ्या खड्ड्यांचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतदेखील गाजला. समाजवादीचे पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या मुद्द्याला सर्वात आधी तोंड फोडले.
ते यावेळी म्हणाले, “मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डयांचा हा भाग मुख्यमंत्र्यांचा आहे, दोन ते तीन आमदार याच भागातले आहे, एक मंत्री देखील याच भागात आहेत, तरीही नागरिकांना या भागात प्रवास करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढावा.’
दरम्यान शेख यांनी यावेळी कळवा टोलनाक्याचा मुद्दा देखील सभागृहात उपस्थित केला आहे. रईस शेख यांच्या मुद्दाला उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी म्हटले की, “या चौपदरी रस्त्याचे आठपदरी रस्त्यामध्ये रूपांतर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. साधारणपणे ऑगस्ट 2024 पर्यंत या रस्त्याचे उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.’ त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडीदेखील कमी होण्यास मदत होणार असल्याचेही भुसे यांनी पुढे म्हटले.
थोरातांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल…
कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील विधानसभेत यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जर तुम्ही सगळे विरोधात असता तर आरडाओरडा केला असता, असे म्हणत थोरात यांनी शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या अजित पवरांच्या गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. “या रस्त्यावर दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा असतात,’ असे देखील थोरात यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांना त्रास नको – विधानसभा अध्यक्ष
यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “जेव्हा शासन कोणत्याही प्रकराच्या विकासाचे काम हाती घेते तेव्हा त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी शासनाने घेणे अपेक्षित असते. तसेच त्यासाठी कोणत्या पर्यायाची व्यवस्था केली आहे ही माहितीदेखील प्रशासनाने नागरिकांना द्यायला हवी.’ तसेच तातडीने या मार्गावर दुसरा पर्याय उपलब्ध करुन नागरिकांना वाहतूक कोंडीचा होणारा त्रास कमी करण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.