-अमित डोंगरे
भारताचा संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासून सातत्याने वेगवेगळ्या अडचणी समोर येत आहेत. सुरूवातीला दोन्ही संघांची माइंड गेम. त्यानंतर परस्परविरोधी मते व टीका तसेच वर्णद्वेषी शेरेबाजी असले प्रकार सुरु झाले. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला नुकसानातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या देशात दौरा करण्याचा मोठा उपकार भारतीय संघाने केला. कारण अन्य कोणत्याही संघाने त्यांच्या देशात जाऊन पन्नास सामने खेळले तरीही ते नुकसान भरून निघाले नसते. मात्र, या दौऱ्यातील तीनही प्रकारच्या सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ खेळाडूंच्या दुखापतीने बेजार झाला आणि सरस कामगिरीला ग्रहण लागले.
या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. त्याच्या दुखापतीने अनेक वादांना जन्म दिला. त्याच्या दुखापतीचे कवित्व संपत नाही तोच ऑस्ट्रेलियात याआधीच्या मालिकेत सातत्याने सरस कामगिरी करणारा इशांत शर्माही जायबंदी झाला. त्यावेळी या मालिकेत भारतीय संघाचे काय होणार हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नव्हती. तरी देखील महंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह व नवोदित नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना घेऊन संघ कांगारूंच्या देशात दाखल झाला. या मालिकेतील एकदिवसीय व टी-20 सामने पार पडल्यानंतर शमी व उमेशलाही दुखापतीने मालिकेतून माघार घ्यावी लागली.
मुळातच बुमराह वगळता संघातील एकाही गोलंदाजाला अनुभव नव्हता. त्यातच टी-20 मालिकेत वर्चस्व राखलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या देखील पूर्ण फिट नसल्याने तसेच तो केवळ एक फलंदाज म्हणूनच खेळू शकतो असे स्पष्ट झाल्याने त्याचीही कसोटी संघात वर्णी लागली नाही. हा देखील भारतीय संघाला एक फटकाच होता.जे गोलंदाजांच्याबाबतीत झाले तेच फलंदाजांच्या बाबतीतही सुरु झाले. दुखापतींचे हे लोण लोकेश राहुलकडेही आले. नेटमध्ये सराव करताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली व त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. याच पार्श्वभूमीवर ऍडलेड कसोटी गमावल्यावरही भारतीय संघाने सकारात्मक मानसिकता ठेवत मेलबर्न कसोटी जिंकली व मालिकेत बरोबरी केली. मात्र, सिडनी कसोटीत सहभागी झालेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा दुखापतींचा फटका बसला. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा हे देखील दुखापतग्रस्त झाले.
मिशेल स्टार्कचा चेंडू अंगठ्याला लागल्याने झालेल्या दुखापतीमुळे जडेजा तिसऱ्या कसोटीत उर्वरीत खेळात सहभागी तर होऊच शकत नाही पण चौथ्या कसोटीतूनही बाहेर गेला आहे. पंतबाबत अद्याप चित्र स्पष्ट नसले तरीही त्याच्याजागी वृद्धिमान साहाने पर्यायी यष्टीरक्षण केल्याने पंतही चौथ्या कसोटीतून बाहेर जाणार हे देखील निश्चित झाले आहे. या दुखापतींचा फटका संघाला बसला असला तरीही सर्वात जास्त नुकसान जडेजा जायबंदी झाल्यामुळे झाले आहे. बदली कर्णधार अजिंक्य रहाणेनंतर केवळ जडेजानेच सरस व सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. फलंदाजी, गोलंदाज व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात जडेजाने या मालिकेत जी कामगिरी केली आहे ती अन्य कोणीही केलेली नाही.
एकदा दुखापतींचा फेरा मागे लागला की भल्या भल्यांची अवस्थाही दयनिय होते. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात सरस कामगिरी केली. मात्र, कसोटी सामन्यांबाबत बोलायचे झाले तर पहिल्या तीनही सामन्यांत पहिले दोन दिवस वर्चस्व राखल्यावर ते कायम राखण्यात भारतीय संघ कमी पडलेला आहे. मेलबर्न कसोटीचा अपवाद वगळला तर बाकी सामन्यात भारतीय संघाने अननुभवी खेळाडूंच्या जोरावर यजमान संघापेक्षा जास्त सरस खेळ केला. यजमान संघही खेळाडूंच्या दुखापतीने त्रस्त असला तरीही त्यांच्याच देशात खेळण्याचा लाभ त्यांना झाला पण भारतीय संघाने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले यात शंका नाही.
मात्र, तिसरी कसोटी सुरु झाली आणि जडेजा व पंतही जायबंदी झाल्याने आता भारतीय संघाच्या आव्हानातील हवाच निघून गेली असून ही कसोटी तर गेल्यातच जमा आहे. मात्र, आता चौथ्या कसोटीतही भारतीय संघ आव्हान वगैरे उभे करण्यात यशस्वी ठरणार नाही हे उघड दिसत आहे. खेळाडूंच्या दुखापतींचे ग्रहण भारतीय संघाला लागले नसते तर मालिकेचा निर्णय वेगळा लागला असता. जर तर हे क्रिकेटमध्ये महत्त्वाचे नसते हे मान्य परंतु शेवटी पराभवाचे काहीतरी कारण द्यावेच लागते. यावेळी दुखापतींचे ग्रहण हे कारण स्पष्ट आहे. असो, या मालिकेत विजय मिळाला नाही तरी अनुभव मात्र, मोठा मिळाल्याचे सांगितले जाईल आणि मग मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत घरच्याच मैदानावर पुन्हा एकदा भारतीय संघ विजयाच्या मार्गावर वाटचाल करेल व ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कटू आठवणी इतिहासजमा होतील.