नवी दिल्ली – छत्तीसगडमधील आदिवासी समुदायांच्या हक्कांचे रक्षण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयश ठरले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मोदी आदिवासी कल्याणासाठी कधी तरी खऱ्या अर्थाने स्वत: ला समर्पित करतील का असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
पंतप्रधानांची आज छत्तीसगड मधील बस्तर येथे सभा होणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांचा दौरा ज्या राज्यात असतो त्या अनुषंगाने मोदींना घेरण्याची मोहीमच कॉंग्रेसने हाती घेतली आहे.
रमेश यांनी म्हटले आहे की बस्तर येथील भाजपच्या व्यवहारावरून असे दिसून आले आहे की मोदींची कॉर्पोरेट मित्रांसोबतची मैत्री लोकांप्रती असलेल्या त्यांच्या कर्तव्याच्या जाणिवेपेक्षा जास्त गहरी आहे. आपण आजवर अदिवासींच्या हितासाठी नेमके काय केले आहे यावर ते बस्तरच्या सभेत भाष्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. छत्तीसगड मधील जैवविविधतेने समृद्ध हसदेव अरण्य जंगल अदानी एंटरप्रायझेसपासून धोक्यात आले आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना, या जंगलाच्या रक्षणासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाने रद्द केलेल्या या जंगलातील ४० कोळसा खाणी पुन्हा त्यांच्या मित्रांच्या घशात गेल्या आहेत.
२००६ मध्ये, काँग्रेस सरकारने ऐतिहासिक वन हक्क कायदा आणल्यावर भारतातील आदिवासी समुदायांचा दशकभर चाललेला संघर्ष संपुष्टात आला, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हा कायदा सीमांत आणि आदिवासी समुदायांना ज्या वनजमिनीवर ते परंपरेने अवलंबून आहेत त्यावर त्यांचा हक्क सांगण्याचा मार्ग प्रदान करतो. परंतु मोदी सरकारने हा कायदा कमकुवत केला असा आरोपही त्यांनी केला.