नवी दिल्ली – ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यावे लागले त्याचप्रमाणे त्यांना तरुणांची मागणी मान्य करून माफी मागत अग्निपथ संरक्षण भरती योजना मागे घ्यावी लागेल असे मत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. सलग आठ वर्षे भाजप सरकारने ‘जय जवान, जय किसान’च्या मूल्यांचा ‘अपमान’ केला आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी हिंदीत या संबंधात जारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,मी यापूर्वीही पंतप्रधानांना शेतीचे काळे कायदे मागे घ्यावे लागतील असे म्हटले होते त्यानुसार त्यांना हे कायदे मागे घ्यावे लागले. आता त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ बनून देशातील तरुणांची मागणी मान्य करत अग्निपथ योजना परत घ्यावी लागेल असे ते म्हणाले.
सरकारने अग्निपथ योजनेद्वारे लष्करी भरतीसाठी नो रॅंक नो पेन्शन अशाच स्वरूपाची भूमिका घेतली आहे. देशभरातील हजारो युवक गेली दोन वर्षे लष्कर भरतीसाठी प्रतिक्षा करीत होते. त्यांना लष्करात पुर्णवेळ जवान म्हणून सेवा करायची होती. पण त्यांना आता केवळ कंत्राटीपद्धतीने चार वर्षासाठीच लष्करात भरतीय करून घेतले जाणार असल्याने हे युवक संतापले आहेत. त्यातूनच त्यांनी संपुर्ण देशभर हिंसक आंदोलन आरंभले आहे. या आंदोलनाला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी समर्थन दिले आहे.