हैदराबाद – केंद्र सरकारच्या अग्निपथ या कंत्राटीपद्धतीच्या लष्कर भरतीला देशभरातील युवकांचा विरोध आहे. त्यासाठी त्यांनी संपुर्ण देशभर हिंसक आंदोलन सुरू केले आहे. ही स्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अकार्यक्षम ठरले आहे त्यामुळे पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार व्ही हनुमंतराव यांनी केली आहे.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, मोदींनी आठ वर्षात सोळा कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. पण त्यांनी आता केवळ चार वर्षांच्या नोकरीची संधी दिली आहे. त्याने युवकांचे काय कल्याण होणार आहे, चार वर्षानंतर हे युवक कोठे जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
युवकांना पुर्ण वेळ नोकरी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहींत असे कारण दिले जात आहेत. याद्वारे त्यांनी देशातील युवकांवर अन्याय केला आहे. मोदींनी प्रत्येक बाबतीत जनतेची फसवणूक केली आहे असेहीं त्यांनी नमूद केले. युपीए सरकारच्या काळात अशा प्रकारची देशव्यापी हिंसक आंदोलने करण्याची वेळ युवकांवर कधीही आली नव्हती असे ते म्हणाले.