मुंबई : महाराष्ट्रातून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवल्याने करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला, अशा आशयाचं विधान पंतप्रधान मोदी यांनी केलं होतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींनी उत्तर देताना हे वक्तव्य केले होते. याच त्यांच्या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आज आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे. तसंच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचं पटोले यांनी सांगितले.
तसेच माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी, “महाराष्ट्र हे देशात करोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचं काम केलं, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे”.
राज्यातल्या भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रातले नेते, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील असतील. ते मोदींच्या वक्तव्याचे समर्थन करत असतील तर त्यांनी जाहीर करावं. ते महाराष्ट्र द्रोही ठरतील. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी.
यावेळी जमावाने पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तसंच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. मोदी ते तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.