नुह (हरियाना) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ श्रीमंत उद्योगपतींचेच लाऊडस्पीकर आहेत गरीबांच्या खिशातील पैसे काढून ते आपल्या श्रीमंत मित्रांना अधिक श्रीमंत करीत आहेत अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचेही वागणे मोदींसारखेच असून त्यांनाहीं गरीबांची काही चिंता नाही असे ते म्हणाले.
मोदी व खट्टर हे स्वताला प्रखर राष्ट्रभक्त म्हणवतात, मग ते सरकारी मालकीच्या कंपन्या श्रीमंतांना का विकत आहेत असा सवालही त्यांनी केला. ब्रिटीशांनी जशी धर्म, जात आणि प्रदेशाच्या आधारावर देशाची विभागणी केली तशीच विभागणी संघ आणि भाजप परिवारातील लोक करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.
मोदी हे तुम्हाला केवळ ट्रम्प आणि अंबानी यांच्या बरोबरच दिसतील ते तुम्हाला कधीही शेतकऱ्यांबरोबर दिसणार नाहीत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.