नवी दिल्ली – चलनवाढ होत असतानाच तूर आणि उडीद डाळीचे दर पुढील वर्षात स्थिर राहावे यासाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत. तूर आणि उडीद डाळीच्या मुक्त आयातीला दिलेली परवानगी मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की रशिया -युक्रेन युद्ध आणि व्याजदर वाढीमुळे जागतिक अन्नधान्याच्या बाजारपेठेमध्ये कमालीची अनिश्चितता निर्माण झाली आहे.
त्याचा परिणाम भारतावरही होणे स्वाभाविक आहे. हा परिणाम कमीत कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अगोदरच करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तूर आणि उडीद डाळींच्या मुक्त आयातील मार्च 2022 पर्यंत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे वर्षभर आयातदार आणि निर्यातदारांना योग्य तो निर्णय घेता येणार आहे. आयात निर्यातीचे धोरण स्थिर ठेवण्याचा प्रयत्न आगामी काळात करण्यात येणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता आयातदार वर्षभर त्यांना योग्य वाटेल तेव्हा आयातीच्या ऑर्डर देऊ शकतील.
त्यामुळे देशातील या दोन डाळींचा पुरवठा संतुलित पद्धतीने होईल आणि भाव वाढ होणार नाही. या अगोदर याच कारणामुळे 15 मे 2021 रोजी तूर आणि उडीद डाळीच्या मुक्त आयातीला 31 आक्टोबर 2021 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर या मुदतीत 31 मार्च 2022 पर्यंत वाढ करण्यात आली.
आता पुन्हा या कालमर्यादेत एक वर्षापर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या तूर डाळीचे दर सर्वसाधारणपणे 102 रुपये प्रति किलो आहेत. गेल्या वर्षी याच काळामध्ये तूर डळीचे धार 105 रुपयावर होते. सध्या उडीद डाळीचे दर 104 रुपये आहेत. एक वर्षांपूर्वी ते 108 रुपये होते.