श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये आज सकाळपासून मोबाईल फोनची सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूमध्ये देखील टूजीच्या स्पीडमधील इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. राज्यातील विविध निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जात असून सध्या जनजीवन सुरळित होण्याच्या मार्गावर आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यातील काही भागात जमावबंदीच्या कलमासह मोबाईल, इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, हेच निर्बंध आता शिथिल करण्यात येत आहेत.
जम्मू-काश्मीरमधील सांबा, कठुआ, उधमपुरमध्ये टुजीच्या स्पीडमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात 5 ऑगस्टपासून इंटरनेट सेवा बंद होती. कलम 370 रद्द केल्यानंतर सावधानता म्हणून फोन आणि इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. तसेच आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सोमवारपासून उघडण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील 12 दिवसांपासून राज्यातील संचार सेवा बंद होती तसेच सतर्कता म्हणून शाळा, महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती जशी निवळेल तसे हे निर्बंध हटवण्यात येतील असे यापुर्वीच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते.