तळेगाव दाभाडे – महायुतीच्या (Mahayuti) स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे (Talegaon dabhade nagarparishad) मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आत बदली करून त्यांच्याजागी एन. के. पाटील यांची वर्णी लावल्यानंतर तळेगावातील सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप करत, आमदार सुनील शेळके हे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंवर (Shrirang barane) भडकले.
नगरपरिषदेचा बट्ट्याबोळ करुन जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत, असा हल्लाबोल त्यांनी बारणेंवर केला. मुख्याधिकारी पाटील यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. कचरा, स्वच्छता, पाणी पुरवठ्यावरुन ते त्रस्त आहेत. त्यामुळे शेळके यांनी गेल्या महिन्यात 10 तारखेला त्यांच्या बदलीची मागणी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. मात्र, त्याची दखल न घेण्यात आल्याने शेळकेंनी पाटलांसह त्यांच्या नियुक्तीसाठी आग्रही असलेले खासदार बारणेंवर हल्लाबोल केला. पाटील यांच्यावर कार्यपद्धतीवर नागरिकांची तीव्र नाराजी असून त्यांना, मात्र जनतेच्या मुलभूत प्रश्नांविषयी कुठलेही गांभीर्य नाही, अशी तोफ त्यांनी डागली. (Sunil shelake)
मागील तीन वर्षात शहराच्या विकासासाठी मी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. असे असूनही रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक बंद ठेवली. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे बिल ठेकेदाराला दिले नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून कसलाही पाठपुरावा केला जात नाही. ज्यांनी असा मुख्याधिकारी शहरात आणला ते बारणे तळेगावच्या सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत. असा थेट घणाघाती आरोप शेळकेंनी केला.
सध्या तळेगावमधील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही. कर भरुनही मूलभूत सुविधांपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या संख्येने आपल्या समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी तक्रार शेळकेंकडे केली. त्यानंतर शेळके चांगलेच भडकले होते. त्यातूनत्यांनी खासदार बारणेंवर टिका केली.