नगर – जिल्ह्यात लम्पी साथरोगाची लागण आटोक्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 603 गावात 855 बाधीत जनावरांची संख्या आहे. तर 292 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मागीलवर्षी हाच आकडा 50 हजारांपर्यंत गेला होता. तरीही पावसाळ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात 13 लाख जनावरांची संख्या असून 72 हजार 685 गोवर्गीय जनावरांची संख्या आहे. त्यात 14 लाख 13 हजार 814 जनावरांचे पशसंवर्धन विभागाने लसीकरण केले असल्याचे आकडेवारी मध्ये दिसत आहे. मागीलवर्षी राज्यात ऑगस्ट 2022 पासून जनावरांमध्ये लम्पी साथरोगाचा कहर पहायला मिळाला. ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या संख्येने बाधित जनावरांची संख्या वाढली.
डिसेंबरपर्यंत बाधित जनावरांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला होता. दरम्यान जनावरे मृत्यू होण्याचे प्रमाणही खूप होते. मागील वर्षीच्या लम्पी लाटेत 4 हजारांहून अधिक जनावरे दगावली. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने मोहीम राबवून दोन महिन्यांत 100 टक्के लसीकरण केले.
जिल्ह्यात सध्या लम्पी आटोक्यात आला असला तरी पावसाळी वातावरण असल्याने शेतकऱ्यानी खबरदारी घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यात कीटक, माशा वाढतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक फवारणी करून गोठ्यात स्वच्छता ठेवावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुसंवर्धन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जिल्ह्यात लम्पीवर शासकीय पशुवैद्यकीय संस्थेत उपचार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी त्याठिकाणी संपर्क साधावा.
डॉ. दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
यंदा मृत्यूचे प्रमाण अल्प
मागील वर्षी बाधीत जनावरांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेल्याने 4 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू चार महिन्यांत झाला होता. यंदा मात्र गेल्या तीन महिन्यात केवळ 292 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सर्व म्हणजे 14 लाख जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाने पूर्ण केले. त्यामुळे यंदा लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहिला. जन्मलेल्या वासरांचे लसीकरणही तातडीने करण्यात येत आहे.
आठवडे बाजार अटी-शर्तींवर सुरू
लम्पी साथ आटोक्यात असली तरी अजून प्रादुर्भाव आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरांचे बाजार, तसेच खरेदी-विक्री बंद करण्यात आली होती. आत मात्र जिल्हाधिकारी यांनी अटीशर्तींवर ज्या तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तेथील बाजार सुरु करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहे.