खटाव – नदीला पाणी सोडावे व ते पाटाद्वारे शेतीला देण्यात येईल. उजवा व डावा कालवा करून व सध्याच्या कॅनॉलद्वारे शेतीला पाणी दिले गेले पाहिजे व लाभार्थी क्षेत्र भिजले पाहिजे. शेतकऱ्यांनी पाणी मागायचं आणि मग पाणी सोडायचं हे बंद झालं पाहिजे. पाण्याचा आवर्तन सुरळीत झालं पाहिजे अशी कडक सूचना आमदार महेश शिंदे यांनी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना केली.
नेर तलावातील जिहे -कटापूरचे पाणी नदीला आणि कॅनोलला सोडण्यासंदर्भात पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिंचन विभागाचे विकास बनसोडे, उदय नांगरे, देसाई, खाडे लेंभे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार महेश शिंदे पुढे म्हणाले, अजून 9.83 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आपल्याला 3.17 टीएमसी पाणी मिळणार आहे. एकूण आपण आठ महिने पाणी वापरू शकतो. सध्या एक ते पंधरा तारखेपर्यंत आवर्तनाने पाणी सोडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची डिमांड असो किंवा नसो आमचे सगळे रिक्त जलसाठे भरून दिले पाहिजेत. यंदा ट्रायल बेस वरती एक हजार तास पंप चालवणे बंधनकारक आहे. त्यातील साडे चारशे तास पंप चालले असून अजून 550 तास शिल्लक आहेत. त्याची कोणतीही पाणीपट्टी शेतकऱ्याला भरावी लागणार नाही. परंतु नेरमध्ये जे पाणी शिल्लक आहे त्याची पाणीपट्टी भरावी लागेल. परंतु खालून येणार पाणी शिल्लक आहे त्यामुळे चालू वर्षी शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरावी लागणार नाही. पुढचे तीन महिने आवर्तन सोडून शेतकऱ्याचा पाणी प्रश्न मिटवावा. दुष्काळ पट्ट्यात असल्यामुळे सोलार सिस्टीमवर सर्व यंत्रणा कार्यान्वित होताच शेतकऱ्याला पुढच्या वर्षी अल्पदरात पाणीपट्टी भरावी लागेल.
यावेळी अधिकारी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली. त्यांच्या समस्या अडचणी ऐकून तात्काळ निवारण करण्यात आले. जुन्या कॅनॉलच्या दुरुस्तीबाबत चर्चा होताच लवकरच नवीन कॅनॉल मंजूर होत असल्याचा यावेळी आमदारांनी सांगितलं. तसेच नवीन सर्व्हे करण्याच्या त्यांनी यावेळी सूचना दिल्या. बैठकीस युवा नेते राहुल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच दीपक घाडगे, अमर देशमुख, डॉ. विवेक देशमुख, मोहन फडतरे, मधुकर पाटोळे, छगनराव कदम, शिवाजी कदम, दादा मोहिते, ज्ञानेश्वर काटकर, कल्याण देशमुख, केशव धुमाळ, अस्लम पठाण, राजेंद्र करळे तसेच शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. अशोकराव कुदळे यांनी आभार मानले.