– माधव विद्वांस
भारताच्या क्रिकेट संघाचे पहिले कर्णधार पद्मभूषण कर्नल सी. के. नायडू यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म नागपूर येथे 31 ऑक्टोबर 1895 रोजी झाला. सी. के. नायडू यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील मछलीपट्टनम येथील होते. नायडू यांचे आजोबा कोट्टारी नारायणस्वामी नायडू नागपुरात स्थायिक झाले. वकिलांच्या प्रतिष्ठित कुटुंबात जन्मलेल्या नायडू यांना लहानपणापासूनच विविध खेळांची आवड होती. त्यांचे वडील वकील होते. ते लंडन येथे शिक्षण घेऊन परतले व येताना क्रिकेटचा खेळही नागपूरला घेऊन आले. त्यांनी आपल्या मुलाला सी. के. नायडू यांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिले.
वयाच्या सातव्या वर्षी त्यांना शालेय संघात सामील करून घेण्यात आले होते. सुरुवातीपासूनच ते आक्रमक फलंदाजी करायचे. नायडू यांनी क्रिकेटमध्ये त्यांच्या शाळा आणि महाविद्यालयाचे नेतृत्व केले. ते उजव्या हाताने फलंदाजी व मंद मध्यमगती गोलंदाजी करायचे तसेच त्यांनी हॉकी आणि फुटबॉलमध्येही प्रावीण्य मिळवले होते. ते उत्कृष्ट धावपटूही होते. प्रथम श्रेणी क्रिकेट पदार्पणात त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.तत्कालीन भारतीय संस्थानिक क्रिकेटला प्रोत्साहन देत असत. इंदूरच्या होळकर सरकारांनी त्यांना वर्ष 1923 मध्ये इंदूर येथे आमंत्रित केले. सुरुवातीस कॅप्टन आणि नंतर त्यांच्या राज्याच्या सैन्यात कर्नल म्हणून सन्मानित केले.
वर्ष 1920 ते 1930 च्या दशकात ते बॉम्बे चौरस स्पर्धेत हिंदू संघासोबत होते. या स्पर्धेच्या इतिहासात ते सर्वाधिक धावा करणारे खेळाडू होते. 1926-27 मध्ये त्यांनी पाहुण्या मेरीलेबोन क्रिकेट क्लब विरुद्ध 11 षटकारांसह 153 धावांची खेळी केली. त्यांचे शतक अवघ्या 65 मिनिटांत पूर्ण झाले. यामध्ये 11 षटकारांचा समावेश होता. हा प्रथमश्रेणी क्रिकेटमधील एक नवीन विश्वविक्रम होता. एमसीसीने त्यांना या शानदार खेळीसाठी चांदीची बॅट दिली. गिलिगन हे इंग्लिश क्रिकेटमधील एक प्रभावशाली व्यक्ती होते. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले आणि वर्ष 1928 मध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली.
भारताला कसोटी दर्जा मिळाला. केवळ नायडू यांच्या खेळीने भारताचा कसोटी दर्जा उंचावण्याचा मार्ग मोकळा केला. वर्ष 1932 मध्ये इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात नायडू यांनी भारताचे नेतृत्व केले. या दौऱ्यात ते भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले. त्याच वेळी त्यांची गोलंदाजी प्रभावी झाली. सी. के. नायडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द केवळ सात कसोटी सामन्यांची झाली. ओव्हलवरील शेवटच्या कसोटीत त्यांची सर्वोच्च धावसंख्या 81 आहे. त्यावेळी ते 40 वर्षांचे होते.
सी. के. नायडू यांनी पहिल्या चार सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, तीन हरले आणि 1934 मध्ये ईडन गार्डन्सवर एक अनिर्णित राहिला. लॉर्डस येथील कसोटी व्यतिरिक्त, सी. के. नायडू यांनी वर्ष 1932/33 मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचे नेतृत्व केले. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला पहिल्या विजयासाठी वर्ष 1952 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. 14 नोव्हेंबर 1967 रोजी इंदूर येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बीसीसीआयने त्यांच्या स्मरणार्थ सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराची स्थापना केली. माजी खेळाडूला दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. भारतामधे सी. के. नायडू चषक सामना भरविला जातो.