पाचगणी -महाबळेश्वरमध्ये दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटरला आग लागून नऊ जण जखमी झाल्याच्या दुर्घटनेनंतर येथील रणमर्द दुर्गा उत्सव मंडळाने यापुढे शहरात डॉल्बी वाजवणार नसल्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. येथील राम मंदिरात आयोजित मंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यावेळी दुर्घटनेतील जखमी मुलांच्या उपचारासाठी निधी उभा करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले.
दसऱ्यादिवशी महाबळेश्वरमध्ये निघालेल्या दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीत जनरेटला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत तीन ते सात वयोगटातील सात लहान मुले व दोन तरुण आगीत भाजल्यामुळे जखमी झाले होते.
या दुर्घटनेवेळी शहरातून इतर मंडळांच्याही विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. या दुर्घटनेमुळे सोशल मीडियावर मंडळांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. या नकारात्मक चर्चेमुळे मंडळांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. तसेच काही गैरसमज झाल्यामुळे घडलेल्या घटनेची माहिती मंडळांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला व घटनेची तीव्रता उशिरा समजल्यामुळे मिरवणुका सुरु राहिल्याचे स्पष्टीकरण मंडळांच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिले. या दुर्घटनेतून बोध घेऊन प्रथम रणमर्द दुर्गा उत्सव मित्र मंडळाने यापुढे डॉल्बी न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुर्घटनेतील जखमी मुलांच्या उपचारासाठी निधीची जमवाजमव सुरु केली आहे. यासाठी मंडळाने स्वत: 21 हजार रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. तर विघ्नहर्ता मित्र मंडळाने 11 हजार रुपये, व्यापारी सनी अरोरा यांनी वैयक्तिक 11 हजार रुपये, हनुमान मंडळाने 11 हजार रुपये, महाबळेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाने 5 हजार रुपये दिले आहेत.
तसेच यापुढे शहरात डॉल्बी वाजवणार नाही असा निर्णय घेतला. पदाधिकाऱ्यांनी स्वतःची बाजू मांडत असताना शहरात डॉल्बीमुळे होत असलेले नुकसान व विनाकारण होत असलेला पैशांचा अपव्यय टाळून यापुढे पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी रणमर्द दुर्गा उत्सव मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन वागदरे, अंकित पलोड, ज्येष्ठ पत्रकार व व्यापारी रमेश पलोड, विशाल तोष्णिवाल, ऍड. संजय जंगम, रामदास जाधव, राजू गुजर, सनी अरोरा, अमय पाटील, शुभम कुंभारदरे, अनंत भिसे, नितीन परदेशी उपस्थित होते.