जयंत माईणकर
लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लीम अल्पसंख्याक तसेच पाकिस्तान, बांगला देशमध्ये
हिंदू अल्पसंख्याक आहेत.
2014 मध्ये मुस्लीम खासदारांची संख्या होती 23. स्वतंत्र भारताच्या इतिहासात इतके कमी मुस्लीम खासदार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असावी. 2019 मध्ये ही संख्या 27 वर पोहोचली. सध्या देशात जवळपास 20 कोटी मुस्लीम बांधव असून त्यापैकी सुमारे 90 टक्के मतदार आहेत.
मागच्या चार लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली असता सर्वाधिक मुस्लीम उमेदवार 2009 मध्ये विजयी झाल्याचे दिसते. 2004 च्या निवडणुकीत 34 मुस्लीम उमेदवार, तर 2009 मध्ये 39 विजयी झाले होते. भारतीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वात जास्त मुस्लीम खासदार 1980 मध्ये बनले होते. त्या वेळी मुस्लीम खासदारांची संख्या होती 49. मात्र पुढे मुस्लीम खासदारांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आणि 2014 मध्ये ती चक्क 23 ला पोचली. 1989 ला 86 जागा जिंकलेला भाजप 2014 ला 282 वर पोचला आणि मत विभाजनाच्या भरवशावर भाजप वाढत गेला.
याठिकाणी 1996 ची यवतमाळची निवडणूक आठवते. 1952 पासून सतत कॉंग्रेस उमेदवार निवडून देणाऱ्या या मतदारसंघात उत्तमराव पाटील यांना उमेदवारी नाकारून कॉंग्रेसने गुलाम नबी आझाद यांना उमेदवारी दिली. आझाद दोन वेळा बाजूच्याच वाशिम मतदारसंघातून निवडून आले होते; पण घडलं उलटच. भाजपने एक प्रचार तंत्र जिल्ह्यात वापरलं आणि भाजपचे राजाभाऊ ठाकरे निवडून आले. 1998 ला कॉंग्रेसने पुन्हा उत्तमराव पाटील यांना उमेवारी दिली आणि ते निवडून आले. मुस्लीम उमेदवारांना राज्यसभेचा किंवा विधानपरिषदेचा मार्ग जाणीवपूर्वक दिला जातो. कारण त्यांच्याच भरवशावर अल्पसंख्याक समाजाची हमखास मिळणारी गठ्ठा मते मिळविता येतात. 2018 साली तेव्हा विधानपरिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांना विधानपरिषदेची अपेक्षित उमेदवारी न देता त्यांच्या जागी वजाहत मिर्झा यांची वर्णी याच कारणासाठी लावली गेली. मिश्र वंशीय लोकशाहीवादी देशात जेव्हा बहुसंख्याक धार्मिक, वांशिक, भाषिक मुद्द्यावर एकत्र येतात तेव्हा अल्पसंख्याक निवडून येण्याची शक्यता कमी होते. इम्रान प्रतापगढी या उत्तर प्रदेशातील शायर व्यक्तीला कॉंग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण लोकसभा आणि विधानसभेतील मुस्लीम खासदार, आमदारांची घटती संख्या!
भारतात घडणाऱ्या घटनांचे पडसाद अखंड भारतातील पाकिस्तान आणि बांगला देश या देशांतही घडतात. जसं भारतात जवळपास 100 कोटी हिंदू आणि जवळपास 20 कोटी मुस्लीम आहेत. पाकिस्तानची सध्याची लोकसंख्या सुमारे 23 कोटी असून त्यातील 20 कोटी मुस्लीम आहेत. जसं भारतात हिंदूंच्या खालोखाल मुस्लीम धर्माचा लोकसंख्येनुसार नंबर लागतो तसाच पाकिस्तानमध्ये मुस्लीम धर्माच्या खालोखाल अल्पसंख्याक म्हणून हिंदू धर्माचा नंबर लागतो. हिंदू समाज आजही पाकिस्तानमध्ये 45 ते 50 लाखांच्या आसपास आहे. तर अनधिकृत आकडेवारीनुसार ही संख्या 80 लाख ते एक कोटीच्या दरम्यान आहे. 20 ते 50 हजारांच्या आसपास शीख धर्माचे लोक राहतात. बांगला देशची लोकसंख्या सुमारे 15 कोटी असून सुमारे 1.25 ते 1.5 कोटी हिंदू जनसंख्या आहे. जसा भारतात प्रमुख अल्पसंख्याक धर्म मुस्लीम आहे तसाच पाकिस्तान आणि बांगला देशातील प्रमुख अल्पसंख्याक धर्म हिंदू आहे.
अल्पसंख्याक समाज जगात कुठल्याही लोकशाहीवादी देशात गठ्ठा मतांसाठी जाणला जातो. हा समाज आपल्याला सुरक्षा, प्रतिनिधित्व पक्षाकडे झुकलेला असतो. ही वास्तविकता अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्व लोकशाहीवादी देशात सारखीच आहे. म्हणूनच अमेरिका, इंग्लंडमधील भारतीय मुख्यत्वे डेमोक्रेटिक आणि लेबर पक्षाला अनुकूल असतात. भलेही ऋषी सूनक हे भारतीय वंशाचे, नारायण मूर्ती यांचे जावई सध्या इंग्लंडचे कॉंझरव्हेटीव्ह पक्षाचे अर्थमंत्री असतील.
भारतीय उपखंडातील तिन्ही देशांतील अल्पसंख्याकसुद्धा आपल्याला सुरक्षा आणि प्रतिनिधित्व देणाऱ्या पक्षाला जवळ करतात. या तीन्ही देशात एक सारखेपणा आहे. या तिन्ही देशात अल्पसंख्याकांनी पारिवारिक पक्षालाच जवळ केलेलं आहे. भारतात आजही मुस्लीम समुदाय नेहरू-गांधींच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला अनुकूल आहे. म्हणूनच या पक्षावर मुस्लिमांचा अनुनय करण्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो.
पाकिस्तानमध्ये हिंदूंसाठी हीच जागा भुट्टो परिवाराच्या पाकिस्तान पीपल्स पक्षाची आहे, तर बांगला देशमध्ये हीच जागा शेख मुजिबुर रहमान प्रणित अवामी लीग या पक्षाची आहे. बेनझीर यांचे पुत्र बिलावल यांचा पाकिस्तानातील शंकराच्या मंदिरात अभिषेक करतानाचा फोटो चांगलाच गाजला होता. 1971 मध्ये शाळकरी असलेल्या बेनझीर या आपले वडील झुल्पिकर अली भुट्टो यांच्याबरोबर सिमला कराराला हजर होत्या. फ्रॉक घातलेल्या बेनझीरची छायाचित्रे आजही पाहायला मिळतात. शेख हसीना या आपल्या कुटुंबाच्या हत्याकांडातून वाचू शकल्या कारण तेव्हा त्या दिल्लीत शिक्षणासाठी होत्या.
हिंदूबहुल भारतात मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून डॉ. झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम, अहमद पटेल यांच्यासारख्या मुस्लीम नेत्यांची मांदियाळी दिसते, तशी या दोन देशांत नसली तरी काही प्रमाणात हिंदू नेतृत्व दिसतं. पाकिस्तानमधील अमरकोट किंवा उमरकोट या हिंदूबहुल आणि हिंदू लोकप्रतिनिधी असलेल्या भागात आजही करणी सिंग सोधा या नावाचं नेतृत्व दिसतं. त्यांचे वडील राणा चंद्रसिंग हे पाकिस्तानात चक्क सात वेळा खासदार होते आणि भुट्टो मंत्रिमंडळात मंत्रीसुद्धा होते. पुढे त्यांनी पाकिस्तान हिंदू लीग या नावाच्या केसरी रंगाचा ध्वज असलेल्या पक्षाची स्थापना गेल्या दशकात केली.
अर्थात भारतात जसे मुस्लीम लीग आहे तसेच पाकिस्तानात हिंदू लीग! अमरकोटचं महत्त्व असे की येथील किल्ल्यात अकबराचा जन्म झाला होता. करणी सिंग यांची पत्नी जयपूरच्या कानोटा (जयपूर) येथील ठाकुर मानसिंह यांची मुलगी. त्यांचा मुलगासुद्धा मंत्री होता. भाजपसारख्या पक्षात एक-दोन मुस्लीम नावं असतात, तशाच प्रकारची हिंदू नावं आपल्याला पाकिस्तानातील प्रत्येक राजकीय पक्षात सापडतील. एमक्यूएम या पक्षात मंगला शर्मा नावाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधी आहेत. तर महेश कुमार मालानी आणि कृष्णा कुमारी यासारखीही नावं पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये सापडतात. कृष्णा कुमारी कोहली या दलित असून सिनेट अध्यक्षाच्या गैरहजेरीत त्या अध्यक्ष होत्या आणि त्याचवेळी पाकिस्तान सिनेटने भारताच्या ताब्यातील काश्मीरविषयी ठराव पारित केला होता. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात पाकिस्तानात झाली होती. दिलीप बरूआ या नावाचे कम्युनिस्ट नेते बांगला देशचे उद्योग मंत्री होते. 2018 साली झालेल्या बांगला देश संसदेच्या निवडणुकीत चक्क 17 हिंदू उमेदवार निवडून आले होते. यात महिलांचाही समावेश आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात जसे मुस्लीम अल्पसंख्याक तसेच पाकिस्तान, बांगला देश मध्ये हिंदू अल्पसंख्याक. तीन देश मिळून 102 कोटींच्या आसपास हिंदू लोकसंख्या आहे, तर सुमारे 55 कोटी मुस्लीम. अर्थात निवडून येण्यासाठी या तीनही देशात अल्पसंख्याकांची मते महत्त्वाची ठरतात. ज्या पक्षाला अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात मतदान करतात त्या पक्षावर इतर पक्ष अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा आरोप करतात. हा आरोप नेहमी बहुसंख्याक धर्माधिष्ठित पक्षाकडून केला जातो. हे अयोग्य असले तरीही हा सल्ला कोणाला देणार? समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांनी भारत-पाक संघराज्य याचा विचार मांडला होता 1960 च्या दशकात. पुढे 1989 मध्ये जर्मनी एक झाला, मात्र युगोस्लाव्हीयाचे सात तुकडे झाले. पाकिस्तान दोन भागात विभागला गेला आणि बांगला देश निर्माण झाला. पण संघराज्याचा विचार कागदावरच राहिला. तीनही देशातील नेते या प्रस्तावावरची धूळ झटकतील का?