करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून प्रचंड प्रतिसाद
नवी दिल्ली – करोनाचा धोका अद्याप संपुष्टात आला नसून त्यामुळे अनेकांना संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यांना पायाभूत सुविधा तसेच दोन वेळचे जेवणदेखील मिळत नाही अशांच्या मदतीसाठी भारताच्या महिला हॉकीपटूंनी पुढाकार घेत जवळपास 20 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे.
देशातील सर्व महिला खेळाडूंनी सढळ हस्ते पुढे यावे व या मदतीत आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन केले होते. या खेळाडूंनी सोशल मीडियावर सर्व सहभागी खेळाडूंना 18 दिवसांचे तंदुरुस्ती चॅलेंज दिले होते. तसेच याबरोबरच प्रत्येक खेळाडूने 100 रुपये दान करा असे अवाहनही केले होते. या आवाहनला मोठा प्रतिसाद मिळाला व मोठी रक्कम उभी राहिली. हा निधी राजधानीतील उदय फाउंडेशनकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या मदतनिधी मोहिमेत मलादेखील सहभाग घेण्याची संधी मिळाली याबद्दल भारताच्या महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने सर्व खेळाडूंचे आभार मानले आहेत.
ज्या समाजाने आपल्याला पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले त्यांना आज मदतीची गरज आहे. देशाकरता काहीतरी करण्याची मिळालेली संधी खूप महत्त्वाची आहे, अशा शब्दात राणीने आपल्या भावना व्यक्त केल्या.