नेवासा – चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीने नेवासा तालुक्यात रविवारी कहर करूनअवघ्या एका तासात फळबागांसह अनेकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले आहे. या वादळात नुकसान झालेल्या फळबाग पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार, खासदारांनी दिले आहेत. त्यामुळे सोमवार सकाळपासूनच नेवासा तालुक्यातील फळबाग पिकांचे पंचनामे महसूल विभागामार्फत करण्यास सुरुवात करण्यात आल्यामुळे नुकसाग्रस्त फळबाग शेतकऱ्यांना आधार आला आहे.
रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यात चक्री वादळाप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्यात फळबागाही नेस्तनाबूत झालेल्या असतानाच गोरगरिबांच्या छतावरील पत्रेही उडून जाऊन घरेही पडलेली आहेत. अनेक ठिकाणी तालुक्यात मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे फळबागाप्रमाणे गोरगरिबांच्या घरांच्या पडझडीचेही पंचनामे करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. या सोसाट्याच्या वादळामुळे मोठ मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्तेही काही काळ बंद झालेले होते. विजेच्या पोलवरील तारा तुटून वीज पुरवठा खंडीत झाला.
या वादळामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झालेले असून महसूल विभागाने नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार शंकरराव गडाख आणि खासदार सदाशिव लोखंडे यांना दिल्या. सोमवारी सकाळपासूनच कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनाम्याची मोहीम सुरू केलेली आहे. केवळ पंचनामे करून जखमेवर मीठ न चोळता आर्थिक मदतीची मागणी खुपटी येथील येथील फळबागधारक शेतकरी संभाजीराव कार्ले पाटील यांनी केली.