पिंपरी (प्रतिनिधी) – ऐन सणासुदीच्या दिवशी शहरातील कुठल्यातरी भागातील वीज पुरवठा खंडित होण्याची महावितरणची परंपरा होळीच्या सणालाही कायम राहिली. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ येथील निगडी गावठाण व पेठ क्रमांक २४ आणि २५ भागात ऐन होळीच्या दिवशी वीज पुरवठा खंडित झाला.
दिवसभर पंखे, कूलर, एसी उपकरणे बंद राहिल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. याची तक्रार महावितरणच्या निगडी कार्यालयात करुनही अधिका-यांनी त्याची दखल घेतली नसल्याची संतप्त प्रतिकि्रया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
निगडी गावठाण प्रभाग क्रमांक १३ मधील पेठ क्रमांक २४ आणि २५ येथे रविवारी (दि. २४) ऐन होळीच्या दिवशी सकाळी दहा वाजता विद्युत पुरवठा अचानक खंडित झाला. सणासुदीच्या दिवशी नागरिकांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी महावितरणच्या निगडी कार्यालयाकडे तक्रार केली. तरी त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
गेली तीन ते चार दिवस विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पंखे, कूलर, एसी अशी उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. उन्हामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. महावितरणचे निगडी कार्यालयातील अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे.