विश्रांतवाडी – धानोरी गावठाण, कमल पार्क, माधवनगर, सिद्धार्थनगर, परांडेनगर, भैरवनगर, गोकुळनगर, आनंदपार्क, मुंजाबावस्ती, चौधरीनगर, कलवड, खेसेपार्क परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत आहे. सध्या कडक उन्हाळा असल्याने विजेच्या या लपंडावामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे प्रभागातील सर्व नागरीक महावितरणच्या कारभाराला कंटाळले आहेत. नागरीकाच्या सतत येणाऱ्या तक्रारींची दखल घेत रेखाताई टिंगरे यांनी वीजपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्यात येइल, असा इशारा दिला आहे. याबाबत महावितरणला रेखा टिंगरे यांच्यावतीने कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत टिंगरे यांनी निवेदन दिले आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्याने प्रभागातील बहुमजली रहिवासी सोसायटीमध्ये पाण्याची समस्याही निर्माण होत आहे. महावितरणला संपर्क साधला असता फोन लागत नाही आणि चुकून फोन लागला तर ‘काम चालू आहे ‘ असे नेहमीचे उत्तर मिळते, अशी तक्रार स्थानिक नागरीक करतात. महावितरणने ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.
महावितरणने तत्काळ आमच्या समस्येची दखल घ्यावी व आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच एखाद्या ग्राहकाने वीजबिल वेळेत भरले नाही तर मीटर काढण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून तत्परतेने करण्यात येते मात्र त्याच तत्परतेने वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर महावितरण ग्राहकांना सेवा दिली जात नाही. धानोरीतील प्रश्नाकडे महावितरणने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे रेखाताई टिंगरे यांनी सांगितले.