मुंबई- “कौन बनेगा करोडपती’ मध्ये एक कोटी रुपये जिंकणाऱ्या बबिता ताडे यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या एसव्हीईईपी कार्यक्रमात अमरावती जिल्हा राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन (एसव्हीईईपी) हा देशातील मतदार जागृती आणि मतदार साक्षरता वाढविण्यासाठीचा निवडणूक आयोगाचा प्रमुख कार्यक्रम आहे. अमरावती येथील अंजनगाव सुरजी गावात राहणाऱ्या ताडे, या अल्पवयीन मुलींसाठी शासकीय शाळेत माध्यान्ह भोजनासाठीच्या स्वयंपाकी म्हणून काम करतात, गेल्या महिन्यात “कौन बनेगा करोडपती’मध्ये त्यांनी भाग घेतला आणि तब्ब्ल 1 कोटी रूपये जिंकले. त्यांच्या या अचानक मिळालेल्या यशामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या.
लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांना आता जिल्हा राजदूत म्हणून निवडले गेले आहे, असे अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना सांगितले. “प्रत्येकाला मतदानासाठी तयार केले पाहिजे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.’ असे ताडे यावेळी म्हणाल्या. मी जनतेशी, विशेषतः खेड्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांचा लोकशाही हक्काचा उपयोग करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर येण्यास उद्युक्त करेन, असेही त्या म्हणाल्या.
21 ऑक्टोबरला होणाऱ्या राज्याच्या विधानसभेच्य निवडणुकीत प्रथमच मतदार, अपंग लोक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मतांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविले आहेत, असे खत्री यांनी सांगितले. यावेळी त्या मतदारसंघात लक्ष देण्यात आले आहे जेथे गेल्यावेळी कमी मतदान झाले होते. लोकशाहीने आम्हाला देश आणि राज्यासाठी प्रशासकीय समिती निवडण्याचा अधिकार दिला आहे आणि लोकांनी मत देण्यासाठी बाहेर यावे, असे खत्री पुढे म्हणाल्या.