नवी दिल्ली: भारतात अजूनही महिलांबाबत जुनाट विचारधारा आहे, यातूनच नकारात्मक मानसिकता तयार होते व तीच महिलांच्या प्रगतीच्या आड येते, यात बदल झाला पाहिजे अशी आग्रही मागणी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने येथे व्यक्त केली. जागतिक आर्थिक मंचच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेल्या सानिया मिर्झाने व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या काही प्रसंगांची देखील यावेळी वाच्यता केली.
एक टेनिसपटू म्हणून ज्यावेळी माझी कारकीर्द सुरू झाली त्यावेळी अनेक विचित्र प्रसंगांना मला सामोरे जावे लागल्याचे तिने सांगितले. ही मुलगी उन्हात अशीच खेळत राहिली तर तिचा गोरा रंग कमी होईल आणि ती काळी पडेल व मग तिचा विवाह होऊ शकणार नाही, असेही बोलले जात होते.
मात्र, आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष केले व खेळावर जास्त लक्ष देत यश मिळविल्याचेही तिने सांगितले.
दुखापतीतून सावरल्यानंतर आता सरावावर लक्ष केंद्रित केलेली सानिया लवकरच व्यावसायिक टेनिसमध्ये सहभागी होणार असून सध्या ती केवळ फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. 2007 पासून 2015 पर्यंत सानियाचा स्वप्नवत प्रवास सुरू होता. मात्र, त्यानंतर तिला अनेक दुखापतींचा सामना करावा लागला.
भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा हिच्याकडून आपल्याला क्रीडा क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगताना, नवोदित खेळाडूंना देखील सातत्याने संधी दिली गेली पाहिजे, असेही सानियाने नमूद केले आहे. जागतिक क्रमवारीत दुहेरी गटात एकेकाळी वर्चस्व राखलेल्या सानियाला दुखापतीने ग्रासले होते. मात्र, आता पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतर सानिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.